
जनतेने तक्रार कशी करावी, कुठे करावी, कोणत्या अधिकाऱ्याकडे करावी याबाबत काय मजकूर लिहावा याची माहिती अनेकांना नसते. तसेच दिलेल्या तक्रारीवर काय कारवाई झाली, याबाबत माहिती नसते
अमरावती ः केंद्र शासनाच्या गृहविभागाद्वारे ई-गर्व्हरनन्स या संकल्पनेला वाव देण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या वतीने नागरिकांना बऱ्याच सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी पोलिस सिटीझन पोर्टल सुरू करण्यात आले. डिजिटल पोलिस पोर्टलच्या माध्यमातून पोलिस व सामान्य नागरिक यांच्यात समन्वय निर्माण करणे हा संकेतस्थळ सुरू करण्यामागचा उद्देश आहे.
जनतेने तक्रार कशी करावी, कुठे करावी, कोणत्या अधिकाऱ्याकडे करावी याबाबत काय मजकूर लिहावा याची माहिती अनेकांना नसते. तसेच दिलेल्या तक्रारीवर काय कारवाई झाली, याबाबत माहिती नसते किंवा गैरसमजुतीमुळे अथवा अनावश्यक भीतीमुळे बहुतांश वेळेस घडलेल्या अनुचित प्रकाराची माहिती पोलिस विभागाला नागरिकांकडून देण्यात येत नाही. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी गृहविभागाने डिजिटल पोलिस संकेतस्थळाच्या माध्यमातून उपक्रम सुरू केला.
नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना सायबर गुन्ह्यांसंबंधित माहिती देण्यासाठी, हरविलेल्या व्यक्तींची माहिती, वाहनांचे नाहरकत प्रमाणपत्र, उद्घोषित फरार आरोपींची माहिती त्यात राहील. राज्य निवड सूचीमध्ये महाराष्ट्र राज्याची निवड केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांचे नागरिकांसाठी उपलब्ध असलेले सिटीझन पोर्टलच्या माध्यमातून कुठूनही ऑनलाइन तक्रार दाखल करू शकतात. तसेच इतरही ऑनलाइन सेवांचा उपयोग घेता येते.
नागरिकांना महाराष्ट्र पोलिस सिटी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदणी करणे, शोधा आणि पाहामध्ये तक्रारीची सद्यस्थिती पाहणे, नागरिकांकडून सूचना अथवा गुप्त माहिती देता येते. गहाळ मोबाईलची सूचना, हरविलेल्या व्यक्तींची माहिती, अनोळखी मृतदेहाची माहिती, अटक व्यक्तींची माहिती, प्रकाशित दखलपात्र प्रथम खबर, वाहन चौकशी, नागरिकांच्या प्रतिक्रिया अशा सेवा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी https://digitalpolice.gov.in/ या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे.
जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली
नव्याने सुरू केलेली व्यवस्था शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी आहे. त्यामुळे वेळेचीही बचत आणि श्रमही कमी होईल. या सुविधेचा लोकांनी लाभ घ्यावा.
-डॉ. आरती सिंह,
पोलिस आयुक्त, अमरावती.
संपादन -अथर्व महांकाळ