नाही नाही म्हणता ‘त्यांनी’ असा उगारला शेतकऱ्यांवर सूड, वाचा...

जलालखेडाः वन्यप्राण्यांनी केलेले शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान.
जलालखेडाः वन्यप्राण्यांनी केलेले शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान.

जलालखेडा(जि.नागपूर) :  सततचा दुष्काळ, मालाला न मिळणारा भाव, टोळधाडीने केलेले आक्रमण, त्यानंतर अधिक पाऊस झाल्यामुळे गोगलगायींची पैदास अशी लांबलचक संकटांची मालिका सुरु असताना पुन्हा एका संकटाची भर...शेतकऱ्यांमागची संकटे कमी होण्याचे नाव दिसत नाही. यावर्षी पावसाचा लंपडाव सुरू असला तरी पिकांसाठी योग्य प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याची पिके सध्या तरी चांगली आहेत. परंतू हातातोंडाशी आलेल्या या पिकांना सर्वाधिक धोका आता जंगली प्राण्यांपासून संभवत असल्याने त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना राबवत आहेत. याला न जुमानता वन्यप्राणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. वन्यप्राण्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याने आता शेतकऱ्यांनी वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच या वन्यप्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची ही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

अधिक वाचा  :  पाऊस जास्त पडतोय म्हणून वाढला ‘या’ सरपटणाऱ्या जिवाचा भयंकर उपद्रव...

सपाट भागातील शेतीकडे वळविला मोर्चा
नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल लागून आहे. याच जंगलाला लागून असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा त्रास होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ते अद्यापही सुरूच आहे. पण या वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा जंगलापासून लांब असलेल्या शेताकडे वळविला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा एक नवीन संकट आले आहे. जंगलातील रोही व डुकरे आधी जंगलाला लागून असलेल्या शेतातील पिकांचे नुकसान करीत होते. यासाठी शेतकरी बिचारा रात्री-बे रात्री शेतात जागली करून काढत होता. पण आता या रोही व डुकर यांनी मोर्चा सपाट भागातील शेतीकडे वळविला असल्यामुळे आता शेतीतील पिकेही सुरक्षित राहिली नाहीत.

नवीन संकटाशी सामना
नुकतेच रोहीच्या एका कळपाने नरखेड तालुक्यातील नायगाव ( ठाकरे ) शिवारात प्रवेश करून सोयाबीनचे पिक नष्ट केले. माधवराव ठाकरे यांच्या शेतातील सोयाबीन रोहीच्या कळपाने फस्त केली व नुकसान केले. याची तक्रार त्यांनी वनविभागाकडे करून नुकसान भरपाईची मागणी केली. ऐन हंगामात रोही व रानटी डुकरांपासून शेतीला सर्वाधिक धोका जाणवत आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना या नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे. या जंगली प्राण्यांपासून शेतकरी धास्तावला आहे. या जंगली प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

अधिक वाचा  :  काटोलच्या गानकोकीळा भाग्यश्री व धनश्री राममंदिर भूमिपूजनप्रसंगी गाणार अयोध्येत...

हवे आहे ६१ लाखांचे अनुदान
दरवर्षी वन्य प्राणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. पण वन विभागाकडून थातुरमातुर नुकसान भरपाई दिली जाते व ती ही बऱ्याच कालावधीनंतर. मागील वर्षीच्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. नरखेड वन विभागाकडून नुकसान भरपाईचे सर्वेक्षण व पंचनामे करून प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. पण नरखेड तालुक्याला पाहिजे असलेले ६१ लाख रुपयांचे अनुदान न मिळाल्यामुळे शेतकरी मात्र अनुदानापासून वंचित आहेत.
 

संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com