नागपूर ः उपराजधानील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांकडून होत असलेल्या मनमानी शुल्क वसुलीविरोधात राष्ट्रीय शिक्षक पालक संघटनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. शाळांवर नियंत्रणासाठी ‘विशेष तपास पथक’ गठित करण्याची मागणी राष्ट्रीय शिक्षक पालक संघटनेने केली आहे.
टाळेबंदीमुळे व्यवसाय, पालकांच्या नोकरीवर संकट आहे. यामुळे पालकांसमोर आर्थिक संकट निर्मांण झाले असल्याने पालकांना शाळांचे शुल्क भरणे अशक्य आहे. त्यातच सध्या शाळाच बंद असून खासगी शाळांकडून सध्या ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत. ऑनलाईन वर्ग घेताना शाळांचा इतर पायाभूत सुविधांवर होणारा खर्च आपसूकच कमी झाला आहे. असे असतानाही शाळांनी आपल्या शुल्कात वाढ केली आहे. याशिवाय शालेय शिक्षण विभागाने शुल्क वसुलीसाठी पालकांवर दडपण आणू नये, अशा सूचना वारंवार दिल्या आहे.
पालकांच्या वारंवार होणाºया तक्रारीची दखल घेत शाळांना कारवाईची ताकीद दिली आहे. असे असतानाही शाळांचा मनमानी कारभार सुरूच आहे. शहराच्या विविध भागातील शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. यासाठी पालकांना शाळेचे शुल्क भरायला सांगितले जात आहे. मात्र, पालकांची आर्थिक स्थिती करोनामुळे बिघडल्याने ५० टक्के शुल्क घ्यावे व ऑनलाईन वर्ग बंद करावे अशी मागणी करण्यात आली. यासाठी शाळा प्रशासनाकडे चर्चेसाठी वारंवार मागणीही करण्यात आली. शाळा प्रशासनाने पालकांशी चर्चा टाळत शुल्क भरण्यासाठी वारंवार पालकांना संदेश पाठवले जात आहेत.
त्यामुळे शाळांच्या अशा धोरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने सीबीएसई शाळांवर ‘विशेष तपास पथक’ गठित करावे अशी मागणी राष्ट्रीय शिक्षक पालक संघटनेचे राष्ट्रीय संयोजक योगेश पाथरे यांनी पालकांच्या वतीने करीत थेट पंतप्रधान कार्यालयासह शिक्षण क्षेत्रातील अनेक विभागांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.