टिपेश्‍वर अभयारण्याची पत उंचावली, महाराष्ट्रातील 11 पैकी लागतो हा क्रमांक

tiger
tiger

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्याने मूल्यमापन व्यवस्थापन प्रभावीपणे राबविल्याने त्यांची पत उंचावली आहे. यामुळेच राज्यातील 11 अभयारण्यांमध्ये टिपेश्‍वरने सहावा क्रमांक मिळविला आहे. वाघाचे अस्तित्व असणे हा अभयारण्याचा एकमेव निकष नसून आजूबाजूच्या परिसराचेही व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. त्यात 12 ते 14 वाघांचे अस्तित्व असलेल्या टिपेश्‍वर अभयारण्याच्या प्रशासनाने प्रभावी व्यवस्थापन केले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

सविस्तर वाचा - नामी शक्‍कल! रुग्णांना शहाळ्याच्या पाण्यातून दारू
अत्यंत दुर्लक्षित असलेल्या या जंगलाला 1998 मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. अभयारण्यात 14 पट्टेदार वाघाचे वास्तव्य आहे. राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्यातील प्रभावी मूल्यमापन व्यवस्थापनाचा (एमईई) 2018-19 सालचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. 148 चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेल्या या अभयारण्याला यंदा 70.80 टक्के गुणांक प्राप्त केलेले आहे. यवतमाळ-नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा अभयारण्याने 62.06 टक्के गुणांक मिळविले आहे. या दोन्ही अभयारण्याचा समावेश "गुड' या क्षेणीत झालेला आहे. टिपेश्‍वर अभयारण्याचे व्याघ्र प्रकल्प करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत.

राज्यातील नऊ अभयारण्याचे प्रभावी
गुणांक देण्याची प्रक्रिया पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या माध्यमातून दरवर्षी करण्यात येते. राज्यातील चार व्याघ्र प्रकल्पांतील प्रभावी मूल्यमापन व्यवस्थापन दर चार वर्षांनी करण्यात येते. 40 टक्के गुणांक असलेल्या अभयारण्याचा समावेश हलक्‍या प्रतीचे, 41.59 टक्के गुणांक म्हणजे योग्य, 60 ते 74 टक्के म्हणजे उत्तम आणि 75 टक्के गुणांक मिळविलेल्या अभयारण्याला सर्वोत्तम दर्जा देण्यात येतो. याशिवाय राज्यातील नऊ अभयारण्याचे प्रभावी मूल्यमापन व्यवस्थापन करण्यात आले. त्यात मयुरेश्‍वर सुपे, नंदुर माधमेश्‍वर, सागरेश्‍वर, संजय गांधी, ठाणे क्रिक, तुंगारेश्‍वर, यावल, येडसी रामलिंगा घाट आणि नायगाव मयूरचा समावेश आहे. ठाणे क्रिक या फ्लेमिंगो वन्यजीव अभयारण्याने 75.95 टक्के गुणांक मिळवून सर्वोत्तम स्थान मिळविले आहे. त्यापाठोपाठ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला 75.80 टक्के आणि मयुरेश्‍वर सुपे 75 टक्के गुणांक मिळाले आहे.
प्रभावी मूल्यमापन व्यवस्थापनाच्या अध्यक्षा आणि राजस्थानचे सेवनिवृत्त वन्यजीवप्रमुख यु. एम. साही हे दरवर्षी ही प्रक्रिया राबवित असतात. 2017-18 साली राज्यातील सहा अभयारण्याच्या व्यवस्थापनाचे मूल्यांकन केले होते. भारतीय वन्यजीव संस्थेने यांनी दिलेल्या यादीनुसारच मूल्यांकन करण्यात येते. देशात सर्वांत प्रथम 2005-06 या वर्षी राखीव क्षेत्राचे मूल्यांकन करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com