अवयवदान करून गरजूंचे उजळूया आयुष्य, २६० जणांनी केला अवयवदानाचा संकल्प

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अचलपूर : अवयवदान करण्यासाठी कायदा होवो न होवो पण जनजागृती करण्याची अतिशय गरज आहे. मृत शरीरातील अवयव काढून विद्रूप करायचे किंवा त्या मृतदेहावर योग्य ते संस्कार होतील की नाही, आत्म्याला मुक्ती मिळेल का नाही? अशी अनेक कारणे तथा गैरसमज आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अवयवदात्यांचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. त्यामुळे अचलपूर तालुक्‍यात जवळपास २६० जणांनी पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून अवयवदानाचा संकल्प केला आहे.

अवयवदानाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आजघडीला कित्येक रुग्णांना उपचाराअभावी किंवा आर्थिक पाठबळ नसल्याने मृत्यूच्या छायेत दिवस काढावे लागतात. अवयवदान करण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. भारतात असलेल्या धार्मिक चालीरीती आणि त्याचा समाजावर असलेला प्रचंड पगडा, यामुळे अवयवदान करण्याची मानसिकता दिसून येत नाही. सरकारने अवयवदानाबाबत कायदा केला खरा, पण त्याबाबत जागरूकता नसल्याने व काही त्रुटींमुळे अवयव प्रत्यारोपणाची वाट दुर्लक्षित राहिलेली आहे. कोणत्याही रुग्णालयात याविषयी माहिती देणारा कक्ष नाही. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा.

प्रत्येक महाविद्यालयात, कंपनीत तसेच प्रत्येक गल्लीत संस्थेमार्फत अवयव प्रत्यारोपणाबाबत माहिती देणारे चर्चासत्र किंवा सेमिनार आयोजित करावे, एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे नऊ जणांना जीवनदान मिळू शकते, याबाबत सर्वानी विचार करून यासाठी पुढचे पाऊल उचलले पाहिजे. अफाट लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशात अवयवदानाबाबत कमालीचा निरुत्साह आहे, हे दुर्दैवच आहे. भारतात दरवर्षी दहा लाख लोक अवयव निकामी झाल्याने आजारी पडतात वा मृत्यूला सामोरे जातात. लोकांमध्ये अवयवदानाबाबत जागरूकतेचा अभाव, सरकारी कायद्याची आडकाठी अशा अनेक कारणांनी अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

व्यक्तींच्या अवयवांना पर्याय म्हणून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातील अवयव काढून त्यांचे प्रत्यारोपणही करता येणे आज शक्‍य झाले आहे. त्यातूनच देहदान, नेत्रदानसारख्या संकल्पना आज रुजत आहेत. मरावे परी देहरूपी उरावे, हा नवा मंत्र सध्या सांगितला जात आहे. परंतु महाराष्ट्रात दुर्दैवाने अवयवदात्यांचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. मात्र त्यातुलनेत अचलपूर तालुक्‍यात अवयवदानाची स्थिती थोडीफार चांगली आहे. तालुक्‍यात आजपर्यंत जवळपास २६० जणांनी पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून अवयवदानाचा संकल्प केला आहे, तर तीन जणांनी अवयव दान केले आहे.

संपादन - नरेश शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com