3 हजार शेतकऱ्यांना महावितरणचा शॉक

File photo
File photo

भंडारा : शाश्‍वत सिंचनासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु, सिंचनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी व सौर पंपासाठी वीजजोडणी देण्यात महावितरणकडून दिरंगाई होत आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात महावितरणकडे कृषी पंप वीज जोडणीसाठी तब्बल 3 हजार 748 शेतकऱ्यांनी डिमांड भरले. त्यापैकी 8 ऑगस्ट 2019पर्यंत अवघ्या 497 शेतकऱ्यांना अधिकृत वीजजोडणी मिळाली तर 3 हजार 251 जणांना वेटींगवर ठेवून शॉक दिला आहे. सौर कृषी पंपाचेही 895 प्रस्ताव पेंडिंग आहेत.

कृषी पंपासाठीच्या प्रलंबित वीज जोडण्याचे प्रमाण दरवर्षी वाढते आहे. हजारो शेतकरी वीज जोडणीसाठी महावितरणच्या कार्यालयांत चकरा मारीत आहेत. विशेष म्हणजे कृषी पंप वीज जोडणीसाठी आवश्‍यक असणारे डिपॉझिटही या शेतकऱ्यांनी महावितरणकडे भरलेले आहे. तीन वर्षांचा विचार केल्यास लाखो रुपये महावितरणकडे जमा आहेत. वीज जोडणी नसल्याने ग्रामीण भागातील हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विहिरींसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करूनही पाणी उपसण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या कृषी पंपासाठी वीज जोडणी नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. धान हे जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. धानाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. पावसाचा अनियमितपणा वाढला आहे. खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात उत्पादन घेता यावे म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध योजनांतर्गत शेतात विहिरी व बोअरवेल केल्या आहेत. परंतु, वीज जोडणी न मिळाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
सौर कृषी पंपाचेही भिजत घोंगडे
मुबलक पाणी उपलब्ध असतानाही विजेअभावी शेतकऱ्यांना सिंचन करणे कठीण झाल्याने सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांना सौर कृषी पंपाच्या केंद्रीय आधारभूत किमतीच्या दहा टक्‍के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्‍के हिस्सा भरून अनुदानाचा लाभ दिला जातो. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एक हजार कृषी पंप भंडारा जिल्ह्यात लावण्यात येणार होते. 1 एप्रिल 2018 नंतर 914 शेतकऱ्यांनी सोलर कृषीपंपाची मागणी केली असून फक्त 19 लोकांना या जोडण्यात देण्यात आल्या. तब्बल 895 प्रस्ताव धूळखात पडले आहेत.

उच्चदाब प्रणालीद्वारे वीजपुरवठा
शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना आता मोठ्या दाबाने वीज पुरवठा होणार आहे. या प्रणालीतून प्रत्येक शेतकऱ्यासाठी स्वतंत्र रोहित्र (डीपी) बसवून थेट रोहित्रावरूनच कृषीपंपाला जोडणी देण्याचे नियोजन केले जात आहे. एप्रिल 2018 पासून लाभ जोडणीच्या (कनेक्‍शन) प्रतीक्षेत असलेल्या 3 हजार 251 शेतकऱ्यांना होणार असून त्यांचा कृषिपंपांना सुरळीत, सुरक्षित आणि पुरेशा दाबाने वीज पुरवठा होणार आहे. यापूर्वी कृषिपंपांना 63 किंवा शंभर केव्हीए क्षमतेच्या डीपीवर पंधरा ते वीस कृषिपंपांना वीज पुरवठा होत असल्याने दाब वाढून डीपी जळण्यासह सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना महावितरणच्या नवीन प्रणालीची प्रतीक्षा लागली आहे. या प्रणालीवर भंडारा जिल्ह्यासाठी 50 कोटी रुपये खर्च होणार आहे. यासाठी निविदा काढून 8 उपपरिमंडळात 15 कंत्राटदारामार्फत कामे केली जात आहेत.

नव्या एचव्हीडीएस प्रणालीत उच्च दाब वाहिनी आहे. त्यावर दहा किंवा पंचवीस केव्हीए क्षमतेचा डीपी असणार आहे. त्यावरूनच थेट जोडणी देण्यात येणार आहे. उच्च दाब वाहिनीसाठी संरक्षण यंत्रणा अधिक परिणाम कारक असल्याने वीज अपघाताचे प्रमाणही नियंत्रणात
असेल. जानेवारी 2020 पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
ए.जी. वैरागडे
प्रभारी अधीक्षक अभियंता
महावितरण, भंडारा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com