Vidhan Sabha 2019 : नक्षलग्रस्त गडचिरोली आज ‘या’ कारणाने आहे चर्चेत

77% Voting in Gadchiroli District
77% Voting in Gadchiroli District

गडचिरोली : महाराष्ट्रातील सर्वात मागास, नक्षलग्रस्त असे शापांचे टिळे चिकटलेला गडचिरोली जिल्हा सर्व क्षेत्रात मागे असला, तरी सरकारचे लक्ष आणि सुविधांपासून वंचित असलेल्या या जिल्ह्यातील नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास तसूभरही कमी झालेला नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील नागरिकांनी लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाने सहभागी होत मोठ्या संख्येने मतदान केले. मागील विधानसभेत 77 टक्के मतदान झाले होते. या विधानसभेत सरासरी 66 टक्के मतदान झाले असून, येथील नागरिक लोकशाहीप्रिय असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

अनेक विकसित जिल्ह्यातील नागरिक सर्व सुविधा असतानाही मतदानास टाळाटाळ करतात. पण, गडचिरोलीचा लोकशाहीप्रेमी माणूस अनंत संकटांवर मात करत मतदान केंद्र गाठतो. गडचिरोली जिल्ह्यात अशी काही गावे आहेत तिथे जायला रस्तासुद्धा नाही. पण, तेथील नागरिकांनीही नद्या, नाले, डोंगर पार करून आपले मतदान केले. आपला लोकशाहीचा हक्क बजावण्यात कोणताच नागरिक मागे राहिला नाही.

सर्वसामान्य नागरिकांसह वृद्ध, दिव्यांगांनीही हा हक्को बजावला. भामरागडच्या अतिदुर्गम अशा तुमरकोठी गावातील प्राजुन लिंगू गावडे या 43 वर्षांच्या मतदाराने तुडुंब भरलेल्या नाल्याच्या पाण्यातून पोहत येऊन मतदानाचा हक्क बजावला. आरमोरी तालुक्यायतील जाईबाई मुरलीधर बोधनकर या शंभर वर्षांच्या, तर अहेरी येथे 98 वर्षांच्या विराबाई रामय्या गुडेलीवार या दोन आजीबाईंनी मतदन केंद्र गाठून मतदान केले. नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या साधनाने मतदान केंद्र गाठले. एटापल्ली तालुक्या तील कोठी येथील मतदान केंद्रावर काही मतदार ट्रॅक्टसरने जात असताना या वाहनाला अपघात झाला. यात कुदरी नवरीलिंगू पुंगाटी (वय 30) व जुनी पेका येरमा (वय 32) या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. पण, हा धोका पत्करूनही नागरिकांनी मतदान केले. 

गडचिरोली उपविभागाअंतर्गत येणाऱ्या पोलिस मदत केंद्र रेगडी हद्दीतील वेंगणुर येथील बूथ सुरक्षेच्या कारणास्तव रेगडी येथे हलविण्यात आले. तरीही हा बदल स्वीकारत वेंगणूरवासियांनी मतदान करून लोकशाहीवर विश्वाास दर्शविला. नक्षलवाद्यांनी मतदान न करण्याच्या धमक्यां देऊनही त्यांच्या धमक्यांना न घाबरता हे नागरिक घराबाहेर पडले. मतदान केंद्रापर्यंत जाण्याचा त्यांचा मार्गही सोपा नव्हता. जंगलातून 13 किमीचे अंतर पार केल्यावर वाटेत आलेल्या कन्नमवार जलाशयाच्या नाल्यातून बोटीने प्रवास करत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. इथल्या माणसाला इतर जिल्ह्याच्या तुलनेत अधिक समस्यांचा सामना करावा लागतो. लोकशाहीविरोधी असलेल्या नक्षलवाद्यांची बंदूक त्यांच्याकडे रोखलेली असते, तरीही संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी ते जिवाची बाजी लावतात, हे खरच इतर मतदारांनी शिकण्यासारखे व अनुसरण्यासारखे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com