'ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' असतात का कधी? - असरानी

Asrani
Asrani

नागपूर - डॉ. मनमोहन सिंग दूरदृष्टी लाभलेले नेते होते. परंतु, त्यांच्यावर ‘ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाची निर्मिती झाली. ‘ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर असतात का कधी? असा सवाल उपस्थित करीत ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी दूरदृष्टी असलेल्या नेत्यांची उणीव  असल्याची खंत व्यक्त केली. देशातील तरुणांना अशा नेत्यांची गरज असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. 

असरानी यांनी भंडारा येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना रामदासपेठ येथील ‘सकाळ’ कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी चित्रपटसृष्टीतील प्रवेश, गेल्या काही दशकात झालेले बदल, काश्‍मीर प्रश्‍न यावरही त्यांनी चर्चा केली. जयपूर येथील महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानचा किस्सा ऐकवित ते म्हणाले, त्यावेळी कॉलेजमध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. कॉलेजमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळत असल्याने कॉलेजसमोर काहींनी घोषणाबाजी केली. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कॉलेजमध्ये सर्वांनाच प्रवेश देण्याच्या सूचना कॉलेज प्रशासनाला केल्या. त्यामुळे कुणीही प्रवेश घेऊ लागले अन्‌ कॉलेजचा दर्जा घसरला, अशा चुका नेते करतात.

काश्‍मीर प्रश्‍नही अशाच चुकातून पुढे आला असून आज देश परिणाम भोगत आहे, असे ते म्हणाले. आज देशाला दूरदृष्टी असलेल्या नेत्यांची गरज आहे. परंतु, दुर्दैवाने अशा नेत्यांची उणीव असून केवळ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अपवाद आहे. त्यांच्या धोरणामुळे न्यूयॉर्क शहरात भारतीय वस्तू कमी दरात मिळते. सदोष शिक्षण प्रणालीमुळे आज असे नेते तयार होत नसल्याचेही मतही त्यांनी नोंदविले. अनेक गावांत शिक्षक नाही, असे नमूद करीत त्यांनी शिक्षणाच्या दर्जावर प्रहार केला. यावेळी संजय लाखेकर, तनिष्का सदस्य युगा भोसे, पी. पद्मा, योगेश भोसे उपस्थित होते. 

इंदिरा गांधीमुळे फिल्म इन्स्टिट्यूटमधील तंत्रज्ञांना काम 
पुणे येथील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. मात्र, पाच वर्षे काम मिळाले  नाही. इंदिरा गांधी यांना ही बाब कळली. त्यांनी निर्मात्यांच्या संघटनेला बोलावून चांगलेच झापले. त्यानंतर फिल्म इन्स्टिट्यूटमधील प्रशिक्षित तंत्रज्ञ, कॅमेरामन यांना चित्रपटांमध्ये कामे मिळणे सुरू झाले. खूप संघर्षानंतर ‘गुड्डी’ हा पहिला चित्रपट इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक असताना मिळाल्याची आठवणही त्यांनी सांगितली. 

दिग्दर्शकाला किंमत नाही 
एकेकाळी दिग्दर्शक चित्रपटाचा प्रमुख होता. त्याला सन्मानाने वागणूक मिळत होती. मात्र, गेल्या काही वर्षांत चित्रपटातील हिरोच निर्माते झाले अन्‌ दिग्दर्शकाला किंमत उरली नाही. प्रत्येक ‘फ्रेम’मध्ये दिसण्यासाठी हिरोचा आग्रह असतो. आज चित्रपट सृष्टी कार्पोरेट झाली. त्यामुळे अनेकदा हिरोंचे कुटुंबीयांकडेही दुर्लक्ष होत आहे. टीव्हीमुळे अनेक कलावंत जिवंत असल्याचेही ते म्हणाले.

शत्रुघ्न सिन्हा, डॅनी, जया बच्चन विद्यार्थी 
पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तेथे आठ वर्षे प्राध्यापक म्हणून शिकवले. जय बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, डॅनी, जलाल आगा हे विद्यार्थी होते. शत्रुघ्न सिन्हा  यांच्यावर बिहारी हिंदीचा प्रभाव होता. त्यांची हिंदी सुधारण्याच्या नादात माझ्या हिंदीचा दर्जा सुमार होतो की काय? अशी भीती होती. परंतु, त्यांची हिंदीही ताळ्यावर आली, असा किस्साही त्यांनी ऐकविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com