नागपूर - अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमधील कृषिपंपांना शुक्रवारपासून सलग 12 तास थ्री फेज वीजपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कृषिपंपांना होणारा 8 ते 10 तास वीजपुरवठा अपुरा ठरत आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या सहाही जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीवरून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी 10 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबरदरम्यान 4 तास अतिरिक्त वीजपुरवठा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना 12 तास वीज द्यावीच लागेल. कोणत्याही कारणाने वीज खंडित झाल्यास नंतर तेवढ्या काळाची भरपाई करावी लागणार आहे. प्रसंगी गावांना कमी वेळ वीज देऊ; पण शेतकऱ्यांना 12 तास वीज मिळेलच, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेतच "बत्ती गुल'
जिल्हा परिषदेच्या सभागृहात ऊर्जामंत्री बावनकुळे यांची नियोजित बैठक आणि पत्रकार परिषद होती. यासाठी प्रशासन सज्ज होते. पण, ऐनवेळी वीजपुरवठा खंडित झाला. या दोषासाठी जिल्हा प्रशासन प्रशासन आणि वीज विभागाकडून एकमेकांकडे बोट दाखविण्यात आले. पण, ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान वीज नसणे हा चर्चेचा विषय ठरला. अंतर्गत दोष निर्माण झाल्याने वीजखंडित झाल्याचे स्पष्टीकरण ऊर्जामंत्र्यांना द्यावे लागले.
दृष्टिक्षेपात -
पूर्व विदर्भातील शेतकरी - 2.30 लाख
अपेक्षित खर्चाचा बोजा - 70 कोटी
अपेक्षित अतिरिक्त वीज - 101 दशलक्ष युनिट
|