नागपूर - तब्ब्ल सव्वा वर्ष पुरेल एवढा साखरेचा साठा देशात आहे. तुरीचेही उत्पादन भरघोस झाले आहे, असे असताना पाकिस्तानातून साखर आयात करण्याची गरज नव्हती, अशी टीका करून भाजपला देश सोडून पाकिस्तानचा शेतकरी जगवायचा आहे का? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'गेल्या वर्षी उसाचे उत्पादन चांगले झाल्याने देशात मोठ्या प्रमाणावर साखरेचा साठा आहे. असे असताना केंद्र सरकारने पाकिस्तानमधून साखर आयात करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी गोदाम फोडल्यानंतर सरकारने साखर आयात केल्याची कबुली दिली. देशातील ऊस उत्पादकांना वाऱ्यावर सोडायचे व पाकिस्तानचे शेतकरी जगवायचे, असे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचे यावरून दिसून येते.''
|