अकोला - स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) एप्रिल 2017 मध्ये सहा सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण झाले होते. त्यामुळे स्टेट बॅंकेशी सहयोगी बॅंकेसहित सहा बॅंकांचे चेकबुक डिसेंबरनंतर अमान्य होणार आहे. याद्वारे कोणताही खातेधारक आपल्या खात्यामधून पैसे काढू शकणार नाही. सुरवातीला सप्टेंबरमध्ये ही व्यवस्था लागू केली जाणार होती. मात्र, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नुकतीच याची मुदत वाढवल्याचे समजते आहे.
प्राप्त माहितीनुसार, एप्रिल 2017 मध्ये सहा बॅंकांचे "एसबीआय'मध्ये विलीनीकरण झाले होते. त्यामुळे सहाही बॅंकांमधील खातेधारकांची खाती "एसबीआय'मध्ये वळविली आहेत. विलीनीकरणानंतर या बॅंकांचे चेकबुक अमान्य करण्यात आले असून, या बॅंकांच्या खातेधारकांना मोबाईल बॅंकिंग अथवा शाखेत येऊन नव्या चेकबुकसाठी अर्ज करावा लागेल. यानंतरच खातेधारक चेकद्वारे व्यवहार करू शकतील.
या बॅंकांचा समावेश...
स्टेट बॅंक ऑफ बिकानेर अँड जयपूर
स्टेट बॅंक ऑफ म्हैसूर
स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर
स्टेट बॅंक ऑफ पटियाला
स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद
भारतीय महिला बॅंक
विलीनीकरणानंतरचे बदल
देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाध्ये सहा बॅंकांचे विलीनीकरण करण्यात आले. त्यासोबतच 1 एप्रिल 2017 रोजी असलेले या बॅंकांचे ग्राहक "एसबीआय'चे ग्राहक असतील. दरम्यान, विलीनीकरणानंतर "एसबीआय'ने आपल्या सुविधा महाग केल्या. बॅंकेने सेवा शुल्कातही बदल केला. ज्याचा परिणाम बॅंक ग्राहकांवर झाला.
विलीनीकरणाचे कारण
"एसबीआय'च्या सहयोगी बॅंकांकडून दिले जाणारे क्रेडिट आणि डेबिट कार्ड सुरवातीपासूनच "एसबीआय'च्या कार्यक्षेत्रात काम करीत होते. अहवालानुसार, संलग्न बॅंकांचे विलीनीकरण झाल्यानंतर "एसबीआय' अधिक मजबूत होईल आणि त्याची आर्थिक स्थितीही चांगली होईल.
|