अकोला (साने गुरुजी साहित्य नगरी) - 'प्रत्येक मुलामध्ये कलागुण दडलेले असतात. प्रत्येक मुलामध्ये एक बालकलाकार, लेखक दडलेला असतो. केवळ त्याला अभिव्यक्त करण्याची गरज असते.
बालप्रतिभेतूनच उत्कृष्ट बालसाहित्याची निर्मिती होते. विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेद्वारे आयोजित पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बालकुमारांना एक मोठे व्यासपीठ मिळाले आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ बालसाहित्यिक तथा पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शंकर कऱ्हाडे यांनी शुक्रवारी केले.
अकोला येथील प्रभात किड्स स्कूल येथील साने गुरुजी साहित्य नगरी येथे आज पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर संमेलनाच्या उद्घाटक डॉ. संगीता बर्वे, मुख्य पाहुण्या मेघना एरंडे-जोशी, विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर आदी उपस्थित होते.
बालकुमार साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बालकांपुढे साहित्य, कलेचे नवे विश्वच खुले झाल्याचे प्रतिपादन डॉ. संगीता बर्वे यांनी केले. डॉ. बर्वे यांनी "अभ्यासाचा ध्यास घेऊनी जगणे सुंदर घडवूया' ही त्यांची बालकविता उद्घाटनप्रसंगी सादर केली. सीमा शेटे (रोठे) यांनी संमेलनासाठी आलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आदींच्या शुभेच्छांचा समावेश होता.
भाषा गौरव दिंडी
बालकुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानिमित्त आज सकाळी सानेगुरुजी साहित्य नगरी येथे भाषा गौरव दिंडी निघाली. अकोला शहर व जिल्ह्यातील विविध शाळांनी यात भाग घेतला. आकर्षक चित्ररथासह येणाऱ्या पथकांनी भारूड, कीर्तन, गोंधळ, वासुदेव, जोगवा, पोवाडा कीर्तन, लेझीम आदी लोककलांसह अंभग, ओवी या काव्य प्रकाराचे बहारदार सादरीकरण केले. यातून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची ओळख व बालकुमारांचे प्रबोधनदेखील करण्यात आले.
फोटो क्रमांक AKO17A28466
|