अंबाझरी प्रदूषित पाणी प्रकरणावर उत्तरासाठी शेवटची संधी

अंबाझरी प्रदूषित पाणी प्रकरणावर उत्तरासाठी शेवटची संधी

नागपूर  : अंबाझरी तलावातील प्रदूषित पाण्याच्या प्रकरणात सर्व प्रतिवाद्यांना उत्तर सादर करण्याची शेवटची संधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. तसेच, उत्तर समाधानकारक नसल्यास 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, अशीदेखील तंबी उच्च न्यायालयाने दिली.
अंबाझरी तलावातील शेकडो माशांच्या मृत्यूच्या घटनेची गंभीरतेने दखल घेत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. नागरी वस्त्यांमधील सांडपाणी व उद्योगांतील रासायनिक पाणी अंबाझरी तलावात मिसळत असल्यामुळे गेल्या काही दिवसांत येथील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. तर दररोज शेकडो माशांचा मृत्यू होत आहे. तलावाच्या काठावर मृत माशांचा ढीग साचला आहे. त्यामुळे कुजलेल्या माशांचा असह्य दुर्गंध परिसरात पसरला आहे. यासंदर्भात पर्यावरण मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योगांतील रासायनिक पाणी व नागरी वस्त्यांमधील सांडपाणी अंबाझरी तलावातील माशांच्या मृत्यूकरिता कारणीभूत आहे. प्रदूषित पाण्यामुळे तलावातील पाणी माशांसाठी घातक झाले आहे. त्यामुळे मासे मृत्युमुखी पडत आहेत. याकडे तातडीने लक्ष न दिल्यास अंबाझरी तलाव जीवरहीत होऊन जाईल, असे बोलले जात आहे. शहरातील विविध वृत्तपत्रांनी हा विषय लावून धरला असल्याने नागपूर खंडपीठानेही माशांच्या मृत्यूची गंभीरतेने दखल घेतली आहे. तसेच राज्याच्या नगरविकास विभागाचे सचिव, महानगरपालिका आयुक्त, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना नोटीस बजाविले होते. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान 26 जून रोजी दिलेल्या आदेशानुसार सर्व प्रतिवादींना उत्तर दाखल करण्यासाठी शेवटची संधी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com