अमरावती : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून डेंगीचे थैमान सुरू आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणात डेंगीचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक होत आहे. तिवसा तालुक्यात तर आतापर्यंत डेंगीने सात जणांचा बळी घेतला आहे. असे असले तरी आरोग्य यंत्रणा मात्र मृत्यूची अधिकृत माहिती नसल्याचे सांगून वेळ मारून नेत असल्याचे बोलल्या जात आहे.
बदलते वातावरण, पावसाची संततधार यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. सर्दी, ताप, खोकला, व्हायरल फिव्हर सोबतच डेंगीचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये रुग्णांनी हाउसफुल्ल झाली आहेत.
अनेक खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करण्यात येत असल्याने नेमकी रुग्णसंख्या किती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वाधिक गंभीर परिस्थिती तिवसा तालुक्यातील आहे.
या ठिकाणी आतापर्यंत सात जणांचा डेंगीमुळे बळी गेला असून त्यामध्ये युवक आणि मुलांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामना करावा तरी कसा?
एकीकडे डेंगीचे रुग्ण वाढत असताना आरोग्य विभाग मात्र बिनधास्त असल्यागत वागत आहे. बदलत्या वातावरणाचा हवाला दिल्या जात आहे. अनेक आरोग्य कंद्रांमध्ये औषधांचा साठाच शिल्लक नाही. अनेक गावांमध्ये फवारणी सुद्धा झालेली नाही, अशा परिस्थितीत नागरिकांनी डेंगीचा सामना करावा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तपासणी लॅब बंदच
अमरावती शहरात असलेली डेंगी तपासणीची लॅब किटच्या अभावात बंद आहे. गेल्या २० ते २५ दिवसांपासून ही लॅब सुरू करण्याच्या संदर्भात हालचाली झाल्या नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नमूने तपासणीसाठी अकोल्याला पाठविण्यात येत आहेत.
१५ सप्टेंबरपर्यंत डेंगीचे ३१५ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. डेंगीमुळे मृत्यू झाला याची स्पष्ट माहिती नाही. उपाययोजना सुरू आहेत.
- डॉ. शरद जोगी, जिल्हा हिवताप अधिकारी.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.