राज्यात पाच हजार कृषिमित्र, कृषीताईंची नियुक्ती

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर: शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी तसेच त्यांचे समुपदेशन करण्यासाठी राज्यात पाच हजार कृषिमित्र व कृषीताईंची नियुक्ती करण्यात येईल. त्यांना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी पत्रपरिषदेत दिली.
या कृषिमित्र व कृषीताईंना प्रशिक्षण देण्यासाठी सुमारे 300 कुशल प्रशिक्षकांना अमरावती येथे प्रशिक्षण देण्यात आले असून, ते गावोगावी जाऊन या दोघांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देतील. या कृषिमित्र व कृषीताईंना 1200 रुपये मासिक वेतन देण्यात येईल, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. हे मास्टर्स ट्रेनर्स बहुविध पीकपद्धती, गोपालन, कुक्कुटपालन, हवामान बदलानुसार पीक निवड आदींबाबत माहिती देणार असल्याचे बोंडे यांनी सांगितले.
जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्याने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा केली आहे. यापूर्वी अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांपुरता देय असलेला या प्रकल्पाचा लाभ आता 2 ते 5 हेक्‍टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार असल्याचे बोंडे यांनी सांगितले. विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आणि हवामान बदलास अतिसंवेदनशील असणारी 4 हजार 210 गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदी खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील 932 अशा एकूण 5 हजार 142 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामान अनुकूल कृषी प्रकल्प) राबविण्यात येत आहे. प्रकल्प गावातील अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे यांना वैयक्तिक लाभाच्या बाबींसाठी अर्थसाहाय्याचे प्रमाण 50 वरून 75 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. तसेच 2 ते 5 हेक्‍टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 65 टक्के अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी शेतकरी गटांना 60 टक्‍क्‍यांच्या मर्यादेत अनुदान दिले जाईल, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

ठिबक अनुदान थकल्यास अधीक्षकांना तक्रार करा
सरकारने सिंचनासाठी ठिबक योजनेला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ठिबकसाठी आता 80 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ठिबक योजनेचे अनुदान थकल्यास कृषी अधीक्षकांकडे तक्रार करावी, असे आवाहन बोंडे यांनी केले.

राख टाकणे योग्य नाही
वीज प्रकल्पातील राख शेतात टाकल्यामुळे जमिनीच्या पोतवर परिणाम होतो. याबाबत त्यांना विचारणा केली असता कृषिमंत्री बोंडे म्हणाले की, हा विषय नवीन आहे. कृषी विद्यापीठ व मृदा सवेंक्षण विभागाला अभ्यास करण्यास सांगण्यात येईल. शेतात राख टाकणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com