ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : राज्याच्या विकासाची चाबी मतदारांच्या हातात आहे. नव्याने राजकारणात आलेल्या आप पक्षाने दिल्ली राज्यात सत्तेत येताच सर्वसामान्य जनतेसाठी पाच वर्षांत जे करून दाखवले ते महाराष्ट्रात सत्ता उपभोगलेल्या कोणत्याच पक्षाला 70 वर्षांत करता आले नाही. आम आदमी पक्षाच्या उमेदवारास निवडून दिल्यास ब्रह्मपुरीसह संपूर्ण राज्याचा दिल्लीप्रमाणे विकास करू, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिले.
आम आदमी पक्षाच्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राच्या उमेदवार ऍड. पारोमिता गोस्वामी यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (ता. 18) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगणावर सभा पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पारोमिता गोस्वामी, राजेश्वर सहारे, मनोहर पवार, रंगाजी राचुरे, जगजित सिंग, सुनील मुसंडी यांची उपस्थिती होती. श्री. केजरीवाल यांनी कोणत्याही पक्षाच्या विरोधात न बोलता आपल्या पक्षाने दिल्लीत सर्वसामान्य जनतेकरिता काय केले यावर जास्त भर दिला. दिल्लीत लोकांनी दरवेळेस फक्त भाजप, कॉंग्रेस पक्षालाच सत्ता दिली होती. मात्र, कोणत्याही पक्षाने सर्वसामान्य जनतेच्या विषयांना महत्त्व दिले नाही. फक्त विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केला. भाजप, कॉंग्रेसला कंटाळून दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला सत्ता दिली. त्यानुसार आम्ही दिल्लीचा विकास केल्याचे केजरीवाल म्हणाले.
आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला विजयी केल्यास दिल्लीप्रमाणे 24 तास वीजपुरवठा,200 युनिट मोफत वीज, मोफत मुबलक पाणीपुरवठा, सर्व शासकीय रुग्णालयांत सर्व उपचार मोफत तसेच सरकारी शाळा सुसज्ज करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.