आता आपली पाळी! जागरुक व्हा महिन्यातल्या त्या चार दिवसांविषयी

period.
period.

नंदोरी (जि. वर्धा) : मासिक पाळी हा महिलांसाठी सनातन प्रश्‍न. आरोग्याचा आणि अस्तित्वाचाही. पण याविषयीची पुरेशी जागरुकता अजूनही आपल्या देशात नाही. महिला आरोग्याचा हा विषय देव-धर्माशीच अधिक जोडला गेला आहे. आजची सुशिक्षित स्त्री सुद्धा त्याविषयी बोलणे लज्जेमुळे टाळते.
ज्या दिवसांत स्वच्छता सर्वांत जास्त गरजेची असते, नेमके त्याच दिवसांत स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष करतात; मात्र हे दुर्लक्ष नंतर आजारात परावर्तित होऊन त्रासदायक ठरू शकते. केवळ अस्वच्छतेमुळे जंतुसंसर्ग झाल्याने अनेक स्त्रियांना स्रीरोगतज्ज्ञांकडे जाण्याची वेळ येते. मासिक पाळीसाठी आज बाजारात सतराशे साठ प्रकारचे सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध असले तरी केवळ ते वापरणे एवढेच स्वच्छतेसाठी पुरेसे नाही, असे स्त्रीरोगतज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने 28 मे हा दिवस मासिक पाळी स्वच्छतादिन म्हणून जाहीर केला आहे. यानिमित्त मासिक पाळीविषयी शास्त्रीय माहिती, प्रसार तसेच जनजागृतीवर भर दिला जातो. मात्र, या कार्यक्रमांशी मर्यादित स्त्रियांच जोडल्या जात असल्यामुळे महिला-युवतींमध्ये मोठ्या प्रमाणात माहितीचा अभाव अद्याप कायम आहे.
स्त्रियांची मासिक पाळी हा आता न बोलण्याचा विषय राहिलेला नाही. किंबहुना गेल्या काही दिवसांत देवळातील प्रवेशासंबंधी सुरू असलेल्या सामाजिक चळवळीच्या मध्यवर्ती हाच विषय होता. मात्र भारतासारख्या असंख्य पातळ्यांवर विभागल्या गेलेल्या समाजाच्या एका स्तरावर ही क्रांती सुरू असतानाच अजूनही लाखो स्त्रियांना मासिक पाळीवर बोलणे आजही नकोसे वाटते, हे वास्तव नाकारता येत नाही. आरोग्याच्या दृष्टीनेही महिन्यातील हे चार दिवस खरे तर महत्त्वपूर्ण असतात. मात्र या दिवसांत शारीरिक व मानसिक स्तरावर होत असलेल्या बदलांमुळे स्त्रियांना ताण येतो व त्याचा साहजिक परिणाम या चार दिवसांकडे दुर्लक्ष करण्याकडे होतो. त्यामुळे जंतुसंसर्गापासून कर्करोगापर्यंतच्या आजारांना निमंत्रण मिळते. स्त्रियांचे आरोग्य चांगले राखले जावे, यासाठी मासिक पाळी महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे दर महिन्याला येणारी अडचण असा दृष्टिकोन न ठेवता मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छता कशी राखता येईल, याकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
स्वच्छता गरजेची
मासिक पाळीशी संबंधित भाग स्त्रियांच्या शरीरातील महत्त्वाचा आणि नाजूक भाग आहे. समाजामधील गैरसमजुतीमुळे स्त्रिया मासिक पाळीविषयी बोलणे टाळतात. मात्र या प्रवृत्तीमुळे स्त्रिया या भागातील स्वच्छता आणि आजाराकडे दुर्लक्ष करतात. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छता केली नाही तर खाज येणे, जंतुसंसर्ग होणे, पांढरे पाणी जाणे यासारखे आजार होऊ शकतात. जंतुसंसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी बराच अवधी लागतो. त्यामुळे वेळीच स्त्रियांनी स्वच्छता राखत आजारांपासून दूर राहावे.
डॉ. दर्शना हिवरकर, हिंगणघाट

सविस्तर वाचा - ठोसे लगावत तिने गाठले यशोशिखर

गैरसमजच अधिक

आजही समाजात मासिक पाळीविषयी गैरसमजच अधिक आहेत. पाळीत होणारे शारीरिक त्रास आणि अनेक सामाजिक बंधने यामुळे स्त्रियांना हा त्यांना मिळालेला एक शाप वाटतो. मात्र मासिक पाळी शाप नसून, वरदान आहे. मासिक पाळीच्या प्रक्रियेतूनच एक स्त्री आई होऊ शकते व निरोगी आयुष्य जगू शकते. मासिक पाळीचा संबंध कुठल्याही अंधश्रद्धांशी न जोडता त्यामागील शास्त्रीय कारणे समजून घेऊन प्रत्येक स्त्रीने निसर्गाने आपल्याला दिलेली सुंदर देणगी म्हणून तिचा स्वीकार केला पाहिजे.
प्रांजली डाखोरे, गृहिणी, हिंगणघाट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com