जिल्हा कृषी अधीक्षकांना बेशरमचे झाड भेट

वर्धा : उमेश गजभिये यांना निवेदन देताना प्रहारचे कार्यकर्ते व शेतकरी.
वर्धा : उमेश गजभिये यांना निवेदन देताना प्रहारचे कार्यकर्ते व शेतकरी.

वर्धा : एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बियाणे कंपनी आणि कृषी विभागातच पाणी मुरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या बियाणे कंपनीवर कारवाई करण्यात यावी, यासाठी प्रहार पक्षातर्फे जिल्हाप्रमुख विकास दांडगे यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करून कृषी अधीक्षकांच्या खुर्चीवर बेशरमचे झाड ठेवले. सहायक प्रशासकीय अधिकारी उमेश गजभिये यांनी निवेदन स्वीकारले.
एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे बोगस निघाले आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतरही या कंपनीचे बियाणे उगवलेच नाही. परिणामी, शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीने केवळ बियाणे बदलून देण्याचे आश्‍वासन दिले आहे; परंतु पेरणी व इतर खर्च देण्याची जबाबदारीही या कंपनीची आहे. याबाबत आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारीसुद्धा प्राप्त झाल्या आहेत. मात्र, कृषी विभागाने या कंपनीविरुद्ध अद्याप कारवाई केली नाही.
कारवाई तर सोडा, शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन पाहणीसुद्धा केली नाही. कृषी विभागातील कर्मचारी टेबलावर बसूनच कागदी घोडे हाकलतात, असे शेतकरी बोलत आहेत. या कंपनीवर तत्काळ कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 25 ते 30 हजार रुपये देण्यात यावे. तसेचे पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर तिबार पेरणीची वेळ आली आहे. ज्या भागात दुबार पेरणी झालेली आहे. त्या परिसरात कृषी विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. या बोगस बियाणे कंपनीवर कारवाई तत्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी दिला.
एकरी 30 हजार रुपये द्या
नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना केवळ बियाणे बदलून देण्याचे आश्‍वासन दिले आहे. इतर खर्च कोण देणार? या कंपनीवर कारवाई करून आम्हाला एकरी 30 हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी देवळी तालुक्‍यातील बाभूळगाव, सोनोरा, दहेगाव आदी गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com