नागपूर - 'गेल्या निवडणुकीत काही लोकांनी खोटी आश्वासने दिली होती. या आश्वासनांवर विसंबून तुम्ही मतदान केले. आता खरे रूप तुम्हाला दिसले; परंतु आता या खोटे आश्वासने देणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. खोटे बोलणाऱ्यांना येत्या निवडणुकीत मतदारांनी ताकद दाखविण्याची वेळ आली आहे,' असे आवाहन भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आज नागपुरात केले.
उत्तर भारतीय परिषदेतर्फे नागपुरात आयोजित कार्यक्रमात शत्रुघ्न सिन्हा आज नागपुरात आले होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता खासदार सिन्हा यांनी केंद्र सरकारवर आपल्या शैलीने टीका केली. सिन्हा म्हणाले, चार वर्षांपूर्वी सत्तेत येण्यापूर्वी खूप आश्वासने तुम्हाला मिळाली होती. आता काय झाले? महागाई आकाशाला भिडली आहे, डॉलरच्या तुलनेत रुपया दररोज गडगडत आहे, करोडो रुपयांचा राफेल गैरव्यवहार झाला आहे. केवळ खोटे बोलून लोकांना फसविण्याचे काम झाले. आता येत्या काही महिन्यांत निवडणुका होणार आहेत. चार वर्षांपासून खोटी आश्वासने देणाऱ्यांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे, असे आवाहन खासदार सिन्हा यांनी या वेळी केले.
|