Vidhan Sabha 2019 वर्धा विधानसभा मतदारसंघात भाजप-कॉंग्रेसमध्ये थेट लढत

File photo
File photo

वर्धा : वर्धा विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होईल, हे आता स्पष्ट झाले आहे. विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर (भाजप) यांच्यासमोर माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे (कॉंग्रेस) यांचे आव्हान आहे. इतर उमेदवारांमध्ये उल्लेखनीय नाव नसल्यामुळे मतविभाजनाचा फारसा प्रभाव पाहायला मिळणार नाही. बसप आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार किती मजल मारतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.
डॉ. पंकज भोयर हे 2014 ला पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत उभे राहिले. पहिल्याच प्रयत्नात त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली आणि विजयही मिळविता आला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ते कॉंग्रेसमध्ये होते. युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे जिल्ह्यात होतेच. त्याचाच फायदा त्यांना मागील विधानसभा निवडणुकीत करून घेता आला. मोदी लाट, माजी खासदार दत्ता मेघे यांची साथ आणि राजकीय अनुभवाच्या भरवशावर त्यांनी विजय मिळविला.
शेखर शेंडे हे तिसऱ्यांदा कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. यापूर्वीच्या दोन निवडणुकीत त्यांना दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. यावेळी उमेदवारी मिळविण्यास त्यांनी फारशी उत्सुकता दाखविली नाही. मात्र, पक्षाने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली. त्यांचे वडील (कै.) प्रमोद शेंडे हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून सर्वपरिचित आहेत. प्रमोदबाबू वर्धा मतदारसंघातून तब्बल सहावेळा निवडून आले. एकदा मंत्रिपद आणि दोनदा विधानसभेचे उपसभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याकरिता शेखर शेंडे मागील अनेक वर्षांपासून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाने नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गावपातळीपर्यंत, वॉर्डावॉर्डांत आणि गल्लीबोळात भाजपचे जाळे विणले गेले आहे. संघटन पातळीवर भाजप कॉंग्रेसपेक्षा सरस आहे. दुसरीकडे, सत्तेत असल्यामुळे विविध विकासकामांची यादीही त्यांच्याकडून मांडली जात आहे. कॉंग्रेसकडे मुद्दे आहेत; पण ते स्थानिक पातळीपेक्षा राष्ट्रीय स्तरावरील अधिक आहेत. काश्‍मीरचा मुद्दा, जीएसटी, नोटाबंदी, महागाई, बेरोजगारी, शेतीचे प्रश्‍न हे सार्वत्रिक मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून होणार आहे. दुसरीकडे, मागील पाच वर्षांत मतदारसंघात झालेली कोट्यवधी रुपयांची कामे आणि विकासाचा "रोड मॅप' घेऊन भाजपतर्फे प्रचार केला जात आहे.
मतदारसंघात जातीय समीकरणे मांडली जात असली तरी त्यावर दोनही उमेदवारांना विसंबून राहता येणार नाही. कुणबी आणि तेली या दोन जातींच्या सभोवताल राजकारण फिरविण्याचा प्रयत्न होतो; मात्र या दोन जातींव्यतिरिक्तचा समाज निर्णायक ठरेल, अशी सध्याची स्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com