भाजपच्या प्रशिक्षण शिबिरातच दुहीची पेरणी!

vashim
vashim

वाशीम : ‘पार्टी विथ डिफरन्स’ या घोष वाक्यातून राष्ट्रीय ते गाव पातळीपर्यंत अनुशासनाचा आदर्श सांगणार्‍या भारतीय जनता पक्षालाच आता पक्षांतर्गत ‘प्रोटोकॉल’ आठविण्याची गरज निर्माण झाल्याची भावना याच पक्षांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने पक्ष बांधनीसाठी आयोजित प्रशिक्षण वर्गात या मतदार संघाच्या आमदारांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याचे धक्कादायक वास्तव कार्यकर्त्यांनीच समोर आणले आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रशिक्षण वर्गातून झालेली ही दुहीची पेरणी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षासाठी कितपत फायद्याची आहे? असा प्रश्‍न राजकीय जाणकारांमधून विचारला जात आहे. 

देशामध्ये ‘आसेतूहिमाचल’ काँग्रेस पक्षाची सत्ता असताना शामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी काँग्रेसच्या भीन्न विचारधारेचे रोपटे लावले होते. प्रसंगी प्राणाचे बलिदान देऊन हे रोपटे जीवंत ठेवले. अनेक कार्यकर्त्यांनी तेव्हापासून प्रस्तावीत राजकीय सत्तेशी संघर्ष करून हा विचार ‘अक्षय’ ठेवला. परिणामी आज देशाच्या 90 टक्के भागावर भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन झाली आहे. सत्तेबरोबर काही दोषही येतात. याचा प्रत्येय वाशीम जिल्ह्यात भारतीय जनता पक्षामध्ये पहावयास मिळत आहे. कडवी पक्ष तत्वनिष्ठा व अंतर्गत मतभेदाला तिलांजली ही ओळख असणार्‍या भारतीय जनता पक्ष वाशीम जिल्ह्यामध्ये मात्र, दोन धृव कार्यरत असल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. पक्षाच्या बॅनरवर पक्षातील काही पदाधिकार्‍यांना स्थान नसणे ही बाब तर नित्याचीच झाली असताना, पक्षाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने मंगरुळपीर शहर व ग्रामीण भागाकरिता भारतीय जनता पक्षाने कार्यकर्ता व पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर सोमवारी (ता. 1) आयोजित केले होते.

मंगरुळपीर शहर व ग्रामीण हे आमदार लखन मलिक यांच्या मतदार संघाचा भाग आहे. या प्रशिक्षण शिबिराच्या निमंत्रण पत्रिकेत मात्र, भाजपचे प्रदेश महामंत्री रामदास आंबटकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश लुंगे, माजी आमदार विजय जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नरेंद्र गोलेच्छा, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, नगराध्यक्ष विरेंद्रसिंह ठाकूर यांची नावे समाविष्ट करण्यात आली. मात्र, याच मतदार संघावर सर्वप्रथम भाजपचा झेंडा फडकविणारे आमदार लखन मलिक यांचे नावही नसल्याने, भाजप अंतर्गत सर्वकाही अलबेल नसल्याचा संदेश भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये गेला आहे. 

महामंत्र्यांचे संघटन कौशल्य गेले कोठे?
या प्रशिक्षण वर्गामध्ये भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री डॉ. रामदास आंबटकर यांचा सहभाग होता. आमदार व महामंत्री होण्याआधी रामदास आंबटकर हे याच भागात पक्षाचे संघटन मंत्री म्हणून आमदार लखन मलिक यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. या मतदार संघाचे त्यांना खडानखडा माहिती असताना, आपल्याच पक्षाच्या एका लोकनियुक्त लोकप्रतिनिधीला त्यांच्याच मतदार संघातील कार्यक्रमातून डावलण्याच्या प्रकाराला मूक संमती होती काय? असा प्रश्‍न या निमित्त जुन्या जाणत्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे. 

कार्यकर्ता अन पक्षच माझे सर्वस्व : आमदार मलिक
गेल्या 40 वर्षांपासून मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता हे पद सर्वांत मोठे आहे. गेल्या 20 वर्षांपासून मतदार संघातील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाच्या भरवशावरच मी विधानसभेत पोहोचलो आहे. त्यांच्यासोबतचा संपर्क व प्रेम कायम असताना, एखाद्या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याने काही फरक पडत नाही. कारण, मतदार संघातील जनतेचे प्रेम माझ्यासोबत आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून ते माझ्यावर प्रेम करतात. पक्ष व कार्यकर्ता माझ्यासाठी सर्वतोपरी आहे. आगामी काळातही मी पक्षाचे निष्ठेने काम करणार आहे. सर्वच कार्यकर्ते माझेच आहेत. अशी संतुलीत प्रतिक्रिया आमदार लखन मलिक यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com