Vidhan Sabha 2019 : भाजपच्या मतांच्या टक्केवारीत सातत्याने वाढ

file phote
file phote

नागपूर  ः मागील 2014 मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या भाजपने कासवगतीने मतांच्या टेक्‍क्‍वारीत कॉंग्रेसला मागे टाकल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. 2004 मधील विधानसभा निवडणुकीत केवळ एक आमदार निवडून आलेल्या भाजपने 2014 मध्ये मोठी झेप घेत सर्वांचेच पाणीपत केले. गेल्या तीन निवडणुकीनंतर कॉंग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत 50 टक्‍क्‍याने घट झाली. नवमतदारांना आकर्षित करण्यात कॉंग्रेसच्या तुलनेत भाजपची रणनिती शहरात यशस्वी ठरल्याचे चित्र आहे. शहरात भाजप, कॉंग्रेस, सेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारिप बहुजन महासंघ व बसपा या पक्षांची निश्‍चित मते आहेत. 2004 मधील निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस, बसपा, सेना व भारिप पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक लढविली. उत्तर, पूर्व, दक्षिण, मध्य या चारही ठिकाणी कॉंग्रेसने 50 टक्‍क्‍यांपर्यंत तर एकूण पाचही मतदार संघात सरासरी 44.6 टक्के मते घेतली होती. भाजपने पाचही मतदारसंघात सरासरी 32.2 टक्के मते घेतली होती. या निवडणुकीत दक्षिण नागपूर मतदार संघात भारिपच्या उमेदवाराने 12 हजारांवर मते घेऊन लक्ष वेधले होते. ही निवडणूक कॉंग्रेससाठी शेवटचे यश ठरले. या निवडणुकीत पूर्व नागपुरातून शिवसेनेने 84 हजार 415 मते घेतली. भाजपला केवळ पश्‍चिम नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने यश मिळाले. 2004 मध्ये दक्षिणमधून भाजपचे पराभूत झालेले मोहन मते आता पुन्हा एकदा नशीब आजमावत आहे. 2009 मधील निवडणुकीपर्यंत भाजपने संघटन बांधणीवर जोर दिला, नवमतदारांना आकर्षित केले तर कॉंग्रेसने तेच जुने चेहरे मतदारांवर थोपवले. याची किंमत कॉंग्रेसला मोजावी लागली. 2009 मध्ये पूर्व नागपुरात तत्कालीन मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा पराभव करीत कृष्णा खोपडे "जाएंट किलर' ठरले. यावेळी सहा मतदार संघ झाल्याने आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्‍चिम मतदार संघ निवडणूक लढविण्यासाठी निवडला. पश्‍चिम नागपुरात सुधाकर देशमुख यांनी अनीस अहमद यांचा पराभव केला. परंतु, कॉंग्रेसच्या या पराभवासाठी 21 हजार आठशेवर मते घेणारे प्रकाश गजभियेच अधिक जबाबदार ठरले होते. याच निवडणुकीत उत्तर नागपुरात अपक्ष म्हणून आताचे आमदार डॉ. मिलिंद माने यांनी 23 हजारांवर मते घेऊन आगामी नेतृत्त्वाचे संकेत दिले होते. 2009 मध्ये कॉंग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत 8.78 टक्‍क्‍यांनी घट झाली तर भाजपच्या मतांच्या टक्केवारीत 6.3 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. भाजपने 38.5 टक्के मते घेतले तर कॉंग्रेसच्या टक्केवारीचा आलेख 44.6 टक्‍क्‍यांवरून 35.82 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला. 2009 मध्ये दक्षिण मतदार संघ सेनेला गेला होता. सेनेने 39 हजारांवर मते घेतली. 2004, 2009 नंतर 2014 मधील निवडणुकीत युती न झाल्याने सेनेची ताकदच नसल्याचे शहरात स्पष्ट झाले. मोदी लाटेत मित्रपक्ष सेनेसह कॉंग्रेसच्या सर्वच उमेदवारांचा धुव्वा उडाला. राष्ट्रवादीला पहिल्यांदाच शक्तीपरीक्षणाची संधी मिळाली. मात्र, या उमेदवारांना अनामत रक्कमही वाचविता आली नाही. सहाही मतदार संघात भाजपचे उमेदवार निवडून आले. 2014 मध्ये भाजपने शहरात सरासरी 49.89 टक्के मते मिळविली. त्या तुलनेत कॉंग्रेसचा आलेख या निवडणुकीत पुरता खाली आला. कॉंग्रेसला केवळ सरासरी 27.75 टक्के मतांवर समाधान मानावे लागले. 2009च्या तुलनेत कॉंग्रेसच्या टक्केवारीत 8 टक्‍क्‍यांनी घट झाली तर भाजपच्या मतांमध्ये 11.39 टक्‍क्‍यांनी वाढ झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com