मातृवंदनेतील आधार निघाले बोगस

file photo
file photo

वर्धा : निरोगी माता आणि सुदृढ बालकांकरिता शासनाच्या वतीने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंमलात आणली जाते. या योजनेचा लाभ देण्यात जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. पण, या योजनेत शंभरावर अर्जदारांनी सादर केलेले आधार बोगस निघाल्याने त्यांच्यावर लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. 

1 हजार 452 मातांना फटका 

आधार कार्डच्या अनियमिततेमुळे मातृ वंदना योजनेचा लाभ देण्यात राज्यात अग्रस्थानी असलेल्या जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 452 मातांना याचा फटका बसला आहे. तर बॅंकेत खाते नसल्याने 61 महिलांना योजनेचा लाभ मिळाला नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत मातेला तीन टप्प्यात एकूण पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. या अनुदानाकरिता शासनाच्या नियमानुसार आधार कार्ड अनिवार्य आहे. अनेक लाभार्थ्यांनी कार्ड देऊनही त्यांना लाभ मिळाला नाही. यावेळी सर्व तपासणी केली असता बोगस आधार कार्डचा हा प्रकार उघड झाल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

आधार कार्ड बोगस 

लाभार्थ्यांकडून दाखल करण्यात आलेल्या आधार कार्डांची तपासणी केली असता क्रमांक वेगळा आणि नाव, छायाचित्र वेगळे असल्याचा प्रकार दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे. यातील काही आधार कार्ड वर्ध्यातील तर काही आधार कार्ड बाहेर गावातील असल्याचे दिसून आले आहे. यामुळे या कार्डांची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. 
जिल्ह्यातील नागरिकांकडे असलेले आधार कार्ड बोगस तर नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. योजनेत सादर केलेल्या नागरिकांकडे हे कार्ड आले कुठून याचा शोध शासनाने घेण्याची वेळ आली आहे. असे बोगस आधार कार्ड आणि कार्डच्या नसलेल्या नुतनीकरणामुळे अनेक लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

20,316 मातांना योजनेचा लाभ 

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवतींना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून आरोग्यात सुधारणा व्हावी, जन्माला येणारे नवजात बालकही सुदृढ असावी याकरिता शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंमलात आणली. या योजनेचा लाभ देण्यात जिल्हा आघाडीवर आहे. आतापर्यंत या योजनेचा लाभ 20 हजार 316 लाभार्थ्यांना मिळाला आहे. या महिन्याचे मिळून एकूण 22 हजार 802 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे. यात ग्रामीण भागातील मातांचा अधिक समावेश आहे. 

507 मातांचा तिसरा हप्ता अडला 

या योजनेचा लाभ तीन हप्त्यात वितरित करण्यात येत आहे. यात पहिला हप्ता एक हजार रुपये, दुसरा आणि तिसरा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या एकूण लाभार्थ्यांपैकी 507 मातांनी योजनेचा आधार कार्डसह आवश्‍यक कागदपत्रांची पूर्ती केली नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तर याच कारणाने 58 मातांचा दुसरा हप्ता अडला आहे. 

फोटो, नाव बदलविणे शक्‍य 

आधार कार्डवर नाव आणि फोटो एडीट करून बोगस आधार कार्ड तयार करणे शक्‍य आहे. पण, त्यावरील कोड बदलविता येत नसल्याची माहिती महाऑनलाइनचे संचालक प्रतीक उमाटे यांनी दिली. 


प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदारांनी त्यांचे नवीन आधार कार्ड जमा करणे अनिवार्य आहे. ही योजना डीबीटी तत्त्वावर आधारित असल्याने आधार कार्डात गडबड असल्यास लाभ मिळणे कठीण आहे. यामुळे लाभार्थ्यांनी नोंदणी करताना त्यांचे आधार कार्ड अपडेट करावे. 
- डॉ. अजय डवले,
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com