बाभूळगाव (जि. यवतमाळ) : शिक्षणासाठी दूरवर ग्रामीण भागातून शहरी ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बसच्या अनियमिततेचा फटका सतत बसत असल्यामुळे कमालीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शुक्रवारी (ता.4) दुपारी 2.15 वाजता बसस्थानकातील एस. टी. बसचा रस्ता अडविला. उपस्थित वाहतूक नियंत्रक व पोलिसांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
तालुक्यातील कळंब मार्गावरील मिटणापूर, नायगाव, देवगाव, कोंढा, वाटखेड, कोटंबा या गावातून बाभूळगाव शहरातील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात. दिवसभर शाळा-महाविद्यालय झाल्यानंतर मानसिक थकवा आलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर आपापल्या घरी जाण्याचे वेध लागलेले असते. नेर एस. टी. डेपोची सायंकाळी साडेपाच वाजता बाभूळगाववरून कळंबमार्गे जाणारी बस दोन महिन्यांपासून वेळेवर मार्गक्रमण करीत नाही. त्यामुळे परतीच्या प्रवासात विद्यार्थ्यांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच उशिरा धावणाऱ्या या बसमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बस वेळेवर धावावी व विद्यार्थ्यांचा मनस्ताप दूर करावा, या मागणीसाठी आठ ते दहा वर्गातील विद्यार्थ्यांनी एस. टी. बसथांब्यावर रस्ता रोखून धरला होता. या आंदोलनामुळे यवतमाळ- धामणगाव मार्गावर धावणाऱ्या एस. टी. बस बसस्थानकातच अर्धा तास अडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.