जंगलातील राष्ट्रीय महामार्गाच्या वाटेत काटे

file photo
file photo

नागपूर : देशात रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्या वन्यजीवांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीवांच्या भ्रमणमार्गांना छेदून जाणाऱ्या रस्ते विकास प्रकल्पाचे नियोजन करू नका अशी सूचना केली आहे. यामुळे राखीव आणि संरक्षित वनक्षेत्रामधून जाणाऱ्या रस्त्यांच्या अपघातात भविष्यात वन्यप्राण्यांचे जाणारे जीव वाचतील असा विचार यात केला आहे.
वन्यजीव अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमधून किंवा त्याच्या नजीकच्या क्षेत्रामधून जाणाऱ्या रस्त्यांमुळे मोठ्या संख्येने वन्यजीवांचे जीव जातात. "वाईल्डलाइफ प्रोटेक्‍शन सोसायटी ऑफ इंडिया' (डब्ल्यूपीएसआय) या संस्थेने वन विभागाकडून मिळविलेल्या माहितीच्या आधारे रस्ते व रेल्वे अपघात मिळून 2014 मध्ये 41, 2015 व 2016 प्रत्येकी 51, 2017 मध्ये 63, 2018 मध्ये 80 बिबट्यांनी जीव गमावला होता. वन्यप्राण्यांच्या मृत्यूबरोबरच संरक्षित वनक्षेत्रामधून जाणाऱ्या रस्त्यांमुळे तेथील पर्यावरणीय समतोलही ढासळला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने यापुढे अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमधून रस्ते विकास प्रकल्पांचे नियोजन न करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्यांना दिला आहे.
पायाभूत विकास प्रकल्प राबविणाऱ्या प्रत्येक राज्यांच्या प्राधिकरणांनी विकास प्रकल्पांचे प्राथमिक पातळीवर नियोजन करतानाच अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमधून महामार्ग (रस्ते) जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. यासाठी रस्ता वळवून घ्यावा लागला तरी चालेल, मात्र या निर्णयाचे पालन सक्तीने करावे अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिल्या आहेत. अशा विकास प्रकल्पांचे बांधकाम हाती घेण्यापूर्वी वन्यजीव संरक्षण कायदा, भारतीय वन कायदा आणि पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत आवश्‍यक असणाऱ्या सर्व परवानग्या मिळविणे अपरिहार्य आहे. महामार्ग संरक्षित वनक्षेत्रामधून घेऊन जाण्याखेरीच दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यास त्याकरिता अधिग्रहित केली जाणारी वनजमीन ही 30 मीटरपेक्षा जास्त नसावी, अशी सूचना केलेली आहे.
देहरादूनच्या "भारतीय वन्यजीव संस्थे'ने (डब्ल्यूआयआय) वन्यजीव रक्षणाच्या दृष्टीने रस्ते किंवा विकास प्रकल्पांच्या रचनेत कोणत्या प्रकारची काळजी घेणे अपेक्षित आहे, याचा अहवाल तयार केला आहे. त्यामुळे प्रकल्प नियोजित करण्यापूर्वी या अहवालात नमूद करण्यात आलेल्या तरतुदींचा विचार सर्व राज्यांच्या पायाभूत विकास प्राधिकरणांनी करावा, अशीदेखील सूचनाही परिपत्रकात केलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com