कोरोनाचा असाही फायदा; चंद्रपूर घेतेय मोकळा श्वास

chandrapur pollution
chandrapur pollution

चंद्रपूर : कोरानाच्या पार्श्र्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडॉऊन मुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. मात्र, याचा वेगळ्या अर्थाने फायदाही झाला आहे. प्रदूषणग्रस्त जिल्हा म्हणून देशात ओळखल्या जाणार्या चंद्रपूर शहरातील हवेतील प्रदूषण तब्बल ४८.२ टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे आता शहर ठप्प झाले असताना शहरवासी मोकळा श्वास घेत आहेत. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात त्याची सुरुवात आधी झाली.  त्यामुळे अनेक कंपन्या, कारखाने, आस्थापना बंद करण्यात आल्या.  दळणवळण यंत्रणा ठप्प झाली. याचा परिणाम हवामानाच्या गुणवत्तेवर झाल्याचे बघायला मिळत आहे. हवामान गुणवत्ता आणि हवामान अंदाज संशोधन केंद्राच्या माहितीनुसार लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे. चंद्रपूरमध्ये मार्च २०१९ च्या  तुलनेत २०२० मध्ये ४८.२ टक्के प्रदूषण कमी झाले आहे. दिल्लीत सुद्धा प्रदूषणाची पातळी ३० टक्क्यांनी तर पूणे आणि अहमदाबामध्ये १५ टक्यांनी कमी झाली आहे. मागील आठवड्यातील ही आकडेवारी आहे. 

श्वसनासाठी धोका वाढवू शकणार्या नायट्रोजन ऑक्साईडच्या (एनओएक्स) प्रदूषणाची पातळीदेखील कमी झाली आहे. नायट्रोजन ऑक्साईडचे प्रदूषण मुख्यतः मोटार वाहनांच्या वाहतुकीमुळे होते. पुण्यात नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण ४५ टक्क्यांनी कमी झाले आहे. मुंबईत ३८ टक्क्यांनी आणि  अहमदाबादमध्ये ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. 

लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे लोक घरीच आहेत. अनेक जण वर्क फ्रॉम होम करीत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कमी आहे. अनेक कंपन्या बंद असल्याने कच्चा  मालाच्या पुरवठ्यासाठीची वाहतूक बंद आहे. वाहतूक बंद असल्याने गाड्यांचा धूर, धुळही कमी झाला आहे. मोठी शहर ठप्प झाली आहे. त्यामुळे शहर आता मोकळा श्वास घेत आहे. मार्च २०१९ मध्ये मुंबईतील हवा एक्यूआय १५३ होती. मात्र आता, २०२० मार्च महिन्यात मुंबईतील वायुची शुद्धता एक्यूआय ६६ इतकी नोंदवण्यात आली आहे.

दिल्ली प्रदूषणाची स्थिती अतिशय वाईट होती. प्रदूषणाचा स्थर इतका खालावला होता की, लोकांना रस्त्यांवरून चालताना मास्क लावून चालावं लागत होतं. पण लॉकडाऊननंतर आता दिल्लीत अनेक वर्षांनंतर हवामानाची स्थिती चांगली, वायूप्रदूषण कमी झाल्याची नोंद हवामान गुणवत्ता आणि हवामान अंदाज संशोधन केंद्राच्या माहितीतून समोर आले आहे. चंद्रपूर, नागपूर, महाराष्ट्र आणि देशातच प्रदूषण ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाले आहे, पक्षांची किलबिल ऎकू येते आहे, असे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com