Vidhansabha 2019 : चंद्रपुरात युतीच्या वर्चस्वाला मिळू शकते आव्हान!

Chandrapur-Loksabha
Chandrapur-Loksabha

मतदारसंघात तसे पाहिले, तर विधानसभेच्या सर्व जागा भाजप आणि शिवसेनेकडे आहेत; पण लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या आघाडीने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निकालानंतर कदाचित त्यांचा हुरूप वाढू शकतो.

लोकसभा निवडणूक निकालाचा थेट परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होईल, असा तर्क राजकीय विश्‍लेषक मांडताहेत. निकालाला वीस दिवस बाकी असताना विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा राजकीय आखाड्यामध्ये रंगत आहे. या वेळी लोकसभा निवडणुकीत प्रथमच काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकदिलाने रिंगणात उतरले. मात्र, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी आणि मतदारसंघावरून ते तसेच राहतील, याची शाश्‍वती नाही.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सहा आमदारांपैकी पाच भाजपचे आणि एक शिवसेनेचा आहे. शिवसेनेचे आमदार असलेले सुरेश (बाळू) धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी आमदारकीचा राजीनामा दिलाय. या सहाही विधानसभा मतदारसंघांतील सामाजिक आणि भौगोलिक स्थिती वेगवेगळी आहे. 

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सध्यातरी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे हा पक्ष शिवसेनेचे किशोर जोरगेवार यांच्यासाठी गळ घालून बसलाय. पण, काँग्रेसच्या तिकीटवाटपातील घोळ बघता त्यांची भूमिका सावध आहे. भाजपकडून विद्यमान आमदार नाना शामकुळे यांना सध्यातरी पर्याय नाही. जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुभाष धोटे यांच्या संस्थेतील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे राजुरा मतदारसंघातील अनेक काँग्रेस नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. पण, धोटे सहजासहजी माघार घेतील, असे वाटत नाही. या मतदारसंघावर शेतकरी संघटनेची पकड चांगली आहे.

त्यामुळे माजी आमदार वामनराव चटप रिंगणात उतरतीलच. राष्ट्रवादीचे सुदर्शन निमकरही इच्छुक आहे. लोकसभेत एकत्र असलेले धोटे, निमकर आणि चटप विधानसभेत एकमेकांसमोर उभे ठाकतील. भाजपचे आमदार संजय धोटे यांच्याविषयी पक्षातच एका गटात नाराजी आहे. परंतु त्यांना पर्याय कोण? हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे.

धानोरकर काँग्रेसवासी झाल्याने वरोरा मतदारसंघात या वेळी भाजपच्या आशा पल्लवित झाल्यात. परंतु, लोकसभेच्या निकालावर या मतदारसंघातील काँग्रेस उमदेवारीचे चित्र स्पष्ट होईल. युतीत नेहमीच हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिलाय. या वेळी शिवसेनेकडे येथे सक्षम उमदेवार नाही. त्यामुळे मतदारसंघ कुणाला सुटेल, हे बघणे औत्सुक्‍याचे ठरेल. राष्ट्रवादीही येथे दावा ठोकण्याच्या तयारीत आहे.

बल्लारपूर मतदारसंघ तीस वर्षांपासून भाजपकडे आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार येथून प्रतिनिधित्व करतात. सध्यातरी काँग्रेसकडे पर्याय नाही. लोकसभा निकालानंतरच सामाजिक समीकरणात बसणारा उमेदवार समोर आणला जाईल, असे वाटते. यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघातही या वेळेला भाजपचा उमेदवार बदलण्याची शक्‍यता आहे.

विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याच्या शोधात भाजप असल्याचे बोलले जाते. काँग्रेसकडून माजी आमदार वामनराव कासावार आणि संजय देरकर यांच्यापैकी एकाच्या गळ्यात माळ पडेल, अशी शक्‍यता आहे. ‘मनसे’कडून राजू उंबरकर मैदानात उतरतील. आर्णी मतदारसंघातील भाजपचे आमदार राजू तोडसाम यांच्या पाच वर्षांतील ‘कर्तृत्वा’शी पक्षनेतृत्व चांगलेच परिचित आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी नवा चेहऱ्याचा शोध पक्षाला घ्यावा लागेल. काँग्रेसकडून शिवाजीराव मोघेंशिवाय पर्याय नाही. परंतु, लोकसभेच्या निकालानंतर यात मोठे फेरबदल होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com