नागपूर : गेल्या काही वर्षात चिमुकल्यांसाठी सुरू केलेल्या चॅनलवरील मालिकांमधून दाखविण्यात येणारी हिंसा, मोबाईलमधील वेगवेगळे गेम्स यामुळे घरातील चिमुकल्यांच्या आक्रमकतेत वाढ झाल्याचे दिसून येते. दिवाणखान्यात पडून एका हाती टीव्हीचे रिमोट तर कधी पालकांचा मोबाईल, असे चित्र प्रत्येक घरात दिसते. मोबाईल, रिमोट हिसकावला तर मुले घरातील साहित्याच्या फेकाफेकीसह हिंसक कृत्याकडेही मागेपुढे पाहात नसल्याने पालकांच्या जिवाला मोठा घोर लागला आहे.
शहरातील प्रत्येक घरातील दिवाणखान्यात पालकांऐवजी चिमुकल्यांचेच साम्राज्य दिसून येते. सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध लहान मुलांसाठीच्या वाहिन्यांवर देशी मालिकांसह विदेशी मालिका हिंदीत अनुवादित करून दाखविल्या जात आहेत. लहान मुले या मालिकांचे चाहते आहेत. एवढेच नव्हे तर दहा वर्षांवरील मुलांमध्ये क्राईम पेट्रोल, सीआयडी, सावधान इंडियासारख्या मालिकातील साहस दृश्यांचेही आकर्षण आहे. यामुळे चिमुकले एका आभासी जगतात वावरत असल्याचे दिसून येते. यातून त्यांच्यात एकलकोंडेपणा वाढत असून, घरी पालकांचे ऐकण्याच्या मनस्थितीत ते नसल्याचे घराघरांतील दृश्य आहे. अनेक मुले मालिकांमधील फाईटची दृश्ये बघून त्याच पद्धतीने वागण्याचा किंवा ती दृश्ये प्रत्यक्षात करण्याचा प्रयत्न करताहेत. त्यातच गेल्या दोन-तीन वर्षांत मोबाईलमधील गेम्सने मुलांना वेड लावले आहे. सध्या पबजीसारख्या गेमने चिमुकल्यांवर भुरळ घातली आहे. कधी टीव्हीचा रिमोट तर कधी मोबाईल, यातच चिमुकले रमत असल्याने बाहेर मैदान, उद्यानात फिरण्यास जाण्यासही ते नकार देत असल्याचे अनेक पालकांचे मत आहे. पालक नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर जात असल्याने शाळेतून घरी आल्यानंतर मुलांसाठी एकमेव टीव्हीच मूळ साधन झाले आहे. अनेक शाळांनी मुलांसाठी विविध विषयाचे ऍप तयार केले असून रंजनात्मक अभ्यासाचा प्रयत्न सुरू केला. यातून पालक मुलांना मोबाईल देत आहेत. परंतु, काही वेळ अभ्यास केल्यानंतर मुले गेम्स सुरू करतात. शाळांचीही सक्ती असल्याने तसेच मुलांच्या कटकटीतून मोकळीक मिळावी, यासाठी मुलांना मोबाईल उपलब्ध करून दिला. पालकांनी मोबाईल हिसकावल्यास मुले तो फेकून देत आहेत, टीव्हीचा रिमोट हिसकावल्यास टीव्हीवर पाणी टाकणे आदीची धमकीच मुले देत असल्याने पालकांनाही चिंतेत टाकले आहे.
बालहट्टाचे नकळत गुन्हेगारीत रूपांतर
मुलांच्या हातातील रिमोट हिसकावल्यास त्यांच्यातील हिंसक वृत्ती वाढल्याचेही दिसून येत आहे. या बालहट्टाचे नकळत गुन्हेगारीत रूपांतर होत असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. दरवर्षी बारापेक्षा कमी वयाच्या मुलांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण दिसून येत आहे. मागील वर्षी प्रकाशित झालेल्या आकडेवारीत बारा वर्षांखालील मुलांवर गुन्हे दाखल झाल्याचे प्रमाण 1.59 टक्के होते.
मुलांमधील आक्रमकतेसाठी लहान कुटुंब असणे हे मुख्य कारण आहे. नोकरी व व्यवसायानिमित्त पालक मुलांना पाहिजे तसा क्वालिटी टाईम देऊ शकत नाही. मुलांची कटकट नको म्हणून त्याला मोबाईल किंवा रिमोट दिल्यास ती मुलांची सवय होऊन बसते. मुलांना नातेवाईक किंवा कार्यक्रम, उद्यानात घेऊन जाणे आवश्यक आहे. अति आक्रमकता असेल तर तज्ज्ञ डॉक्टरकडे दाखविणे आवश्यक आहे. मुलांचे समुपदेशन व औषधीद्वारे ते दूर करता येते.
- डॉ. वसंत खळतकर, बालरोगतज्ज्ञ.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.