वाईटातून चांगले घडते ते असे! कोरोनामुळे टळला बालविवाह

bal vivah.
bal vivah.

अचलपूर(जि. अमरावती) : कोरोनामुळे अनेक जमलेले विवाह पुढे ढकलण्यात आले. अनेकांची तयारी वाया गेली. त्यामुळे त्या सगळ्यांनी कोरानाच्या नावाने बोटे मोडली. मात्र कोरोनामुळे एक बालविवाह रोखला गेल्याची घटना नुकतीच समोर आली आणि वाईटातून चांगले घडते, हे यामुळे सिद्ध झाले. खरे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाइन सेंटरमध्ये असलेल्या तरुणाचे आज लग्न होणार होते. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तथा कोरोनाच्या संकटात होऊ घातलेला बालविवाह टळला. आता हे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. नियोजित वधूचे वय 17 वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या घटनेने आजही बालविवाह होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अचलपूर येथील 27 वर्षीय तरुण लग्नाच्या 15 दिवसांपूर्वी 10 जूनला दिल्लीवरून शहरात दाखल झाला. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमानुसार त्याला संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले. दरम्यान 25 जूनला त्याला सुटी दिली जाणार होती. त्याच दिवशी सकाळी 11 वाजता त्याचे लग्न होणार होते.

परिणामी एरवी कठोर वागणाऱ्या प्रशासनाने यावेळी मात्र पुढाकार घेत त्याचे लग्न करण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी लग्नाची तयारी सुरू करण्यात आली. शासकीय अधिकाऱ्यांनी या लग्नाच्या तयारीचा भार उचलला. काही वधु पक्षाकडून तर काही वर पक्षाकडून तयारीला लागले.
अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी मुलाची, तर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी मुलीची बाजू सांभाळण्याचे निश्‍चित केले. नवरीचे हार, बुके तथा लग्न लावण्यासाठी भटजी याची जबाबदारी नगरपालिकेचे कर निरीक्षक रोहन राठोड यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती, तसेच नवरदेवाचे कपडे, खुर्च्या, मंडप, नाष्टा, चहा, साऊंड सिस्टीम या सर्वांची व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान, उपविभागीय अधिकारी यांनी मुलीचे नेमके वय जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात वेगवेगळी माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे प्रशासनाने यावर विश्वास न ठेवता त्या वधूचा शाळेकडून दाखला मिळविला. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना 24 जूनला पाठविलेल्या पत्रात वधूची जन्मतारीख 7 मे 2003 होती. या दाखल्यावरून वधूचे वय 17 वर्षे असल्याचे लक्षात आल्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेत चालवलेली लग्नाची तयारी थांबविली. प्रशासनाने कारवाई न करता क्वारंटाइन सेंटरमध्ये असलेल्या नवरदेवाला व त्याच्या नातेवाईकांना लग्न थांबविण्याचा तथा लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. त्या तरुणाने व मुलीच्या नातेवाइकांनी प्रशासनाचा सल्ला मानून वधू अठरा वर्ष पूर्ण झाल्यावरच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सविस्तर वाचा - आता तुकाराम मुंढेंना करणार नगरसेवक बदनाम, हा घेतला निर्णय

सतर्क प्रशासन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाइन असलेल्या तरुणाचे होणारे लग्न थांबविण्यात आले आहे. वधूचे वय 17 वर्षे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह टळला.
रोहन राठोड, करनिरीक्षक, नगर परिषद, अचलपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com