Modi Govt : मोदी-शहांच्या हुकूमशाहीमुळे शेतकऱ्यांचे मरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress rahul bondre criticize Modi shah govt over farmer issue crop crisis

Modi Govt : मोदी-शहांच्या हुकूमशाहीमुळे शेतकऱ्यांचे मरण

चिखली : केंद्रातील मोदी सरकार शेतकरी हिताचे नसुन लोकशाही कागदावरच उरली आहे, मोदी शहांची हुकूमशाही सुरू असल्याने सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी कृषी कार्यालयाला घेराव घालुन आंदोलन प्रसंगी व्यक्त केली.

सोयाबीनचे बाजार भाव वाढवुन मिळावे तसेच शेतकरी अहिताच्या धोरणांमुळे रखडलेल्या पीक विम्याची रकमेसह खरीप हंगामातील पीक नुकसानाची भरपाई रक्कम शेतकऱ्यांना मिळावी या व इतर मागण्यांकरीता महाविकास आघाडीच्यावतीने बुलडाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात आज २७ मार्च रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला घेराव घालुन आंदोलन करण्यात आले.

चिखली विधानसभा मतदार संघात आज महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता करण्यात आलेल्या आंदोलनात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बोंद्रे यांच्या नेतृत्वात आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, ज्योती खेडेकर, मनोज दांडगे, श्रीकिसन धोंडगे, कपिल खेडेकर, नंदु कऱ्हाडे, अतहरोद्यीन काझी, श्रीराम झारे, रवि तोडकर, आदी नेत्यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जिल्हा, तालुकाभरातुन आलेले शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

कलापथक व डफड्यांच्या निनादाने बैलगाडीवरील महाविकास आघाडीचे पदाधिकारी या घेराव आंदोलनात सहभागी झाले होते. प्रसंगी शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती दाखविणारे देखावे करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसह मित्र पक्षातील विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तथा शेतकरी बांधव व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या घेराव आंदोलन प्रसंगी संचलन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक म्हस्के यांनी तर आभार प्रदर्शन तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर यांनी केले.

शेतकऱ्यांना देशाद्रोही ठरविणारे सरकारः आ. बोंद्रे

राहुल बोंद्रे पुढे म्हणाले की, या सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई, अतिवृष्टीच्या रकमा दिल्याच नाहीत उलट शेतकऱ्यांना देशाद्रोही, दहशतवादी ठरवुन नामानिराळे झाले. अंबानी, अदानी सारख्या उद्योगपतींना पाठीशी घालुन त्यांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज माफ केल्याने त्याचा भुर्दंड मात्र देशातील जनतेला सहन करावा लागत आहे.

हे सरकार खोकेबाजः आमदार धीरज लिगांडे

यावेळी आमदार धीरज लिगांडे म्हणाले हे सरकार खोकेबाज असुन या सरकारने शेतकरी रसातळाला नेवून ठेवला तर सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारांचा खच पडत आहे. सरकार काही लोकाचे लाड पुरवणारे असुन शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ मार्गी न लावल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करु.

हुकुमशाही चालविणारे मोदी सरकार : सपकाळ

माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले केंद्र व राज्यातील सरकार लोकशाही गिळंकृत करून देशात हुकमशाही आणणारे सरकार ठरत आहे. सध्या भाजपाच्या कंपूत घबराट असुन दिल्ली मुंबईवाल्यांना घाम फुटला आहे, या देशातील लोकशाही गेली तर ठोकशाही येईल, जनता दारिद्रयाच्या खाईत लोटण्याचे काम मोदी सरकार करीत आहे.