Accident News : कंटेनरची रातराणीला धडक; सहा जागीच ठार, १६ जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

container ST accident 6 killed and 16 injured police hospital Sindkhed Raja

Accident News : कंटेनरची रातराणीला धडक; सहा जागीच ठार, १६ जखमी

सिंदखेड राजा : कंटेनरने समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक व बसमधील अन्य चार प्रवासी, अशा सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज मंगळवारी (ता. २३ मे) पहाटे पावणे सहा वाजेच्या दरम्यान मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पळसखेड चक्का (ता. सिंदखेड राजा) गावाजवळ घडला. या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले असून त्यातील १६ प्रवासी गंभीर आहेत. गंभीर जखमींवर जालना येथे उपचार सुरू आहेत.

मेहकर आगाराची रातराणी बस (क्र. एमएच ४० वाय ५८०२) ही पिंपरी चिंचवड पुणे येथून मेहकरकडे येत होती. आज पहाटे ती तालुक्यातील पळसखेड चक्का गावाजवळ पोहोचली. दरम्यान समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरने (क्र. ओडी ११ एस १६५७) या रातराणी बसला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, कंटेनरने बसचालकाकडील बसगाडीची बाजू अर्ध्या भागापर्यंत अक्षरशः चिरत नेली.

कंटेरने रातराणीला धडक दिल्यामुळे पहाटेचा निरव शांततेत मोठा आवाज झाला. तो आवाज ऐकून गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यास तातडीने सुरवात केली होती. काही तासांतच किनगांव राजाचे ठाणेदार युवराज रबडे व पोलिसही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना ॲम्बुलन्स व खासगी वाहनाने रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी व पोलिस विभागांच्या अधिकाऱ्यांनी ग्रँडर मशीनच्या साहाय्याने कंटेनरचा लोखंडी पत्रा चिरून कंटेनर चालकाचा मृतदेह बाहेर काढला.

जखमींना व मृतदेहांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. किरकोळ जखमी प्रवाशांना सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर, गंभीर जखमी प्रवाशांना उपचारासाठी जालना येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहेच. ग्रामीण रुग्णालयासमोर नातेवाईक व नागरिकांनी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, तहसीलदार सुनील सावंत, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक बी.बी. महामुने, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली आहे. ठाणेदार केशव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

गंभीर जखमींवर जालन्यात उपचार

अपघातात गंभीर जखमी झालेल्या १६ प्रवाशांना जालना येथे हलविण्यात आले असून तेथे विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहे. या जखमी प्रवाशांमध्ये जया पाटोळे (३८), अर्चना ठाकरके (२०), विकास अनिल व्यवहारे (३५), श्वेता पाटोळे (१७), सार्थक पाटोळे (वय १७), गायत्री तहकिक (१५, सर्व रा. मेहकर), सुनील वाघ (४३),

योगेश सदाशिव जुमडे (३०, दोघेही रा. दुसरबीड), राहुल भीमराव मोरे (६५, आंचली, ता. चिखली), जीवन सुधाकर डेरे (४२, राजेगांव), हर्षदा पाटोळे (१८, लोणार), सुनीता लव्हाळे (४८, लव्हाळा), रुक्मिणी वाघ (५०, सिंदखेड राजा), वत्सला मोहन चव्हाण (४७, कोरेगांव), मंजुळा विशाल शिर्के (२३, पुणे), उल्हास दुबे (५०, रा. हजारीबाग, झारखंड) यांचासमावेश आहे.

मृत प्रवाशांची नावे

शेषराव उत्तमराव खराबे (वय ६५, अंत्री देशमुख, ता.चिखली), बसचालक राजू तुकाराम कूलाल (४२, वडगांव तेजन, ता. लोणार), गोकर्णा रामदास खिल्लारे (४५, केळवद, ता. चिखली), वनमाला किशोर पवार (३०, बेळगांव, ता. मेहकर), सीमा सोमेश्वर जोशी (५०, मेहकर). मृत कंटेनर चालकाचे नाव वृत्त लिहिस्तोवर कळू शकले नाही.

अमरावती जिल्ह्यातील अपघातात दोन चिमुकल्यांसह पाच जण ठार

दर्यापूर (जि. अमरावती) : टाटानगर बाबळी येथील एकाच कुटुंबातील सदस्य अंजनगाव येथे लग्नासाठी गेले होते. तो समारंभ आटोपून परतताना त्यांच्या टाटा एस वाहनाला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील लेहगाव फाट्याजवळ सोमवारी (ता. २२) रात्री अकरा वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झालेत. धडकेमुळे वाहनातील बाराही प्रवासी रस्त्यावर फेकल्या गेले होते. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकची तोडफोड केली.