श्रावणातील पहिली झड आणि त्यामुळे कशावर झाला परिणाम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील जलसाठा शंभर टक्‍क्‍यांकडे वाटचाल करीत असून नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. जलपातळी चांगलीच उंचावली आहे. या मोसमातील हा पहिला दमदार व संततधार पाऊस बरसला असून श्रावणातील ही पहिलीच झड आहे.

दोन दिवसांतील पावसानंतर पंधरवड्यात जिल्ह्यात ८३.२ मिमि पाऊस झाला असून पावसाने धार कायम ठेवली आहे. या पावसाने जनजीवनावर परिणाम झाला आहे.
जून व जुलै या दोन महिन्यात जिल्ह्यात सरासरी ४६१ मिमि पाऊस झाला असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरी ८३.२ मिमि पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी रात्रीपासून रिपरिप पावसाने जिल्हाभरात सुरूवात केली, ती कायम आहे. गेल्या चोवीस तासांत सरासरी २१ मिमि पाऊस बरसला असून सर्वाधिक पावसाची नोंद मोर्शी तालुक्‍यात ३३.९ मिमि झाली आहे. जिल्ह्यातील अप्पर वर्धा या सर्वांत मोठ्या धरणाची अकरा दरवाजे उघडण्यात आली असून धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे वर्धा नदीपात्रातील जलपातळी उंचावली आहे. दरम्यान मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्‍यात मात्र अजूनही पावसाने सरासरी गाठलेली नाही.

पावसाळ्यातील अडीच महीने उलटून गेले आहेत. या मोसमातील ही पहिलीच झड अनुभवावयास मिळाली आहे. रिपरिप पावसाने पूर्ण जिल्हा व्यापला असून मुसळधार पावसाची नोंद कुठेही नाही. त्याचबरोबर अद्याप वित्त किंवा जीवित हानीचीही नोंद नाही. नदी व नाल्यांच्या जलपातळीत चांगलीच वाढ झाली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील लघू प्रकल्प पूर्ण भरले आहेत. पूर असताना नागरिकांनी नदीपात्र किंवा नाले ओलांडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची चमू सज्ज करण्यात आली आहे.

संपादन - नरेश शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com