अखेर कंत्राटदाराची मनमर्जी भोवली

buldhana
buldhana

बुलडाणा : गेल्या काही दिवसापासून नांदुरा ते जळगाव जामोद या मार्गाचे काम सुरू असून, कंत्राटदार हे मनमर्जीपणे काम करत आहे. याबाबत सातत्याने काम करताना काळजी व सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांनी केली होती. परंतु, याकडे कंत्राटदार व अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अखेर आज (ता. 3) गुरुदेव आश्रम नजीक काम सुरू असताना तब्बल दोन तास वाहतूक थांबल्यामुळे संतप्त झालेल्या वाहनधारकांनी चार मालवाहू टिप्पर व एक बेलोरो यांच्या काचा फोडून राग व्यक्त केला. ढिसाळ नियोजन करून लहान- मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या कंत्राटदारावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी सध्या होत आहे. 

जळगाव जामोद ते नांदुरा या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. परंतु, सदर काम हे कंत्राटदार मनमर्जी करत चांगला असलेला डांबरीकरण रस्ता उखडून त्यावर मातीचा भर टाकत करत आहे. यामुळे गेल्या पंधरा दिवसाअगोदर अचानक अवकाळी पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखल होऊन दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांना चांगलीच अडचण निर्माण केली होती. विशेष म्हणजे महामार्ग प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे रस्ता बनवीत असताना सुरक्षिततेचे उपाय तसेच निश्‍चित ठिकाणी वाहन वळण्याचे मार्ग फलक व रेडीयम लावणे गरजेचे असताना कंत्राटदार हे केवळ बघ्याची भूमिका घेत झाडांच्या फांद्या व प्लॅस्टिक पिशव्या लावून मार्ग वळण दाखवीत आहे. यामुळे अनेकदा वाहनधारकांना रात्री अंधारात रस्ता कुठे जात आहे हेच दिसत नसल्यामुळे मोठी समस्या होत आहे.

आज सकाळपासून नांदुरा ते जळगाव जामोद मार्गावरील रेल्वे गेट ते निमगाव रस्ता खोदकाम करण्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी कंत्राटदाराने कोणतीही सूचना व माहिती फलक न लावल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. एकीकडे मालवाहू ट्रक रांगेत उभे तर दुसरीकडे चार ते पाच फुट गेलेले खोदकाम यामुळे वाहतूक पुर्णत: विस्कळित झाली. तब्बल दोन ते तीन तास वाहतूक ठप्प झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थी, नोकरदार तसेच व्यावसायिकांची चांगलीच अडचण झाली. परिणामी काही प्रवाशांनी मालवाहू ट्रक काढण्याचे सांगितले असता कंत्राटदाराच्या चालकाने मनमर्जी करत वाद केला. यामुळे संतप्त झाले वाहनधारकांनी चार मालवाहू टिप्पर व एक बोलेरोच्या काचा फोडून त्यांच्या संताप व्यक्त केला. 

पोलिसात तक्रार नाही
प्रवाशांकडून अचानक संताप व्यक्त करत कंत्राटदारांच्या वाहनांचे करण्यात आलेल्या नुकसानीसंदर्भात दुपारपर्यंत कोणतीही तक्रार पोलिसात देण्यात आली नव्हती. परंतु, वाहने रस्त्यावरच उभी ठेवल्याने अनेकदा काही वेळासाठी वाहतूक विस्कळित होत असल्याचे चित्र दिसून आले होते. 

प्रशासनाचेही दुर्लक्ष
कंत्राटदाराच्या चुकीमुळे वाहनधारकांना वेठीस पकडण्याचा प्रकार सुरू असून, याविरोधात तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी रिपाई युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी प्रशासनाकडे केली होती. परंतु, याकडे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सदर प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com