कापूस खरेदी लांबणीवर, यंदाही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच

cotton selling not starts in yavatmal
cotton selling not starts in yavatmal

यवतमाळ : गेल्या हंगामात जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्रांवर 32 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. यंदाही एवढाच कापूस येण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 97 हजार शेतकऱ्यांनी 29 लाख क्विंटल कापसाची नोंदणी केली आहे. असे असले तरी दिवाळीपूर्वी खरेदी केंद्रे सुरू होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात नऊ लाख हेक्‍टरवर खरीप हंगामाची लागवड झाली आहे. त्यात जवळपास साडेचार लाख हेक्‍टरवर कापसाचा पेरा झालेला आहे. असे असले तरी यंदा परतीच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. कापूस ओला झाल्याने यंदा शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढणार आहेत. ओल्या कापसाला कमी दर देऊन काही व्यापाऱ्यांनी कापूस घेण्याचे मनसुबे आखले आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रे सुरू होण्याची प्रतीक्षाच शेतकऱ्यांना आहे. शासनाने यंदा पाच हजार 825 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पसंती शासकीय खरेदी केंद्रांनाच आहे. यंदा शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. कोणता शेतकरी किती कापूस आणणार आहे, याचा डाटा संकलित केला जात आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील 95 हजार शेतकऱ्यांनी कापूसविक्रीसाठी नोंदणी केली आहे. जवळपास 29 लाख क्विंटल कापसाची नोंदणी शेतकऱ्यांनी केली आहे. खासगीमध्ये चार हजार ते चार हजार दोनशे रुपये दर कापसाला दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या आणखीन वाढण्याची शक्‍यता आहे. काही दिवसांपासून कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणीला सुरुवात केली आहे. बाजार समितीत नोंदणी केली जात आहे. नोंदणीसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आतापर्यंत अर्धेअधिक शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत शासकीय हमीभावानुसार खरेदी करण्याच्यादृष्टीने केंद्र सुरू केली नाहीत. दुसरीकडे खासगीत कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र, अल्पदरात खरेदी केला जात आहे.  

जिल्हाधिकाऱ्यांना 'एसओपी' सादर -
कापूस खरेदीच्या दृष्टिकोनातून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कोणती तयारी केली, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली होती. शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, त्यादृष्टीने 'एसओपी' तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने 29 लाख क्विंटल कापूस येण्याचा अदांज वर्तविला आहे. त्यानुसार खरेदीचे मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांना दिल्या आहेत.

'सीसीआय'नंतर उघडणार 'पणन'ची केंद्रे -
कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी केंद्र उघडण्याबाबत 'पणन'च्या हालचाली सुरू होत्या. मात्र, शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. 'सीसीआय'नेही केंद्र सुरू केलेली नाहीत. त्यांचे केंद्र सुरू झाल्यानंतर 'पणन'चे केंद्र सुरू होणार आहेत. त्यामुळे आता 'सीसीआय' आपले केंद्र कधी सुरू करणार, यावरच 'पणन'च्या केंद्रांचे वेळापत्रक अवलंबून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com