सवना, (जि. यवतमाळ) : दारू सोडण्यासाठी वैद्याने दिलेली भुकटी प्राशन केल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यातील दोन्ही मृत हे वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील असून, तिसऱ्या अनोळखी व्यक्तीचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उमरखेड तालुक्यातील एकांबा (वन) येथील गोविंदराव महाराज यांच्या मठात दारू सोडण्यासाठी सतीश अंबादास जाधव (वय 30) व शंकर चंद्रभान गावंडे (वय 55) हे दोघेही आपल्या नातेवाइकांसह आले होते. महाराजांच्या शिष्यांनी त्यांना झाडपत्तीचे औषध दिले. ते प्यायल्यावर दोघांनाही त्रास सुरू झाला. पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. त्यामुळे भयभीत नातेवाइकांनी महाराजांना विनंती करून त्यांच्या वाहनाने जवळच्या रुग्णालयात नेण्याची विनंती केली; मात्र महाराजांनी आलेल्या ऑटोनेच परत जाण्याचा सल्ला दिला, तोपर्यंत दोघांचीही प्रकृती गंभीर झाली.
नातेवाइकांनी त्यांना तातडीने फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. आज त्यांचे मृतदेह सवना येथील ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले, तर तिसरा व्यक्ती गंभीर असून, त्याच्या नातेवाइकांनी त्याला कोणत्या रुग्णालयात दाखल केले, याची माहिती मिळू शकली नाही. पाण्यात भुकटी टाकून पिण्याचे औषध दिल्याने दोघांचाही मृत्यू झाल्याचा आरोप मृताची बहीण सारिका साळुंके (रा. वरुड ता. पुसद) यांनी केला आहे.
|