महात्मा गांधींचे नातेवाईक; ज्येष्ठ गांधीवादी कन्नुभाई मश्रुवाला काळाच्या पडद्याआड

gan
gan

अकोला : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जवळचे नातेवाईक तथा ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्य सैनिक कृष्णकांत उपाख्य कन्नुभाई नानाभाई मश्रुवाला यांचे शनिवारी (ता.2) सकाळी 8 वाजता येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. अकोल्यातील सामाजिक, सांस्कृतिक चळवळीचे ते प्रेरणास्थान होते. अकोल्यातील खुले नाट्यगृहासमोरील त्यांच्या राहत्या घरीच शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या कन्नुभाईंनी स्वातंत्र सैनिकांनी मिळणारी पेंशन व ताम्रपटही नाकारला होता. अतिशय साध्या पद्धतीने व महात्मा गांधी यांच्या विचारांनुसार त्यांनी शेवटपर्यंत आपले जीवन व्यतीत केले.

अकोल्यातील स्वातंत्र्य चळवळीतही ते सक्रिय होते
कन्नुभाई मश्रुवाला यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1923 रोजी अकोला येथे झाला होता. महात्मा गांधी यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या स्नुषा सुशिला माणिलाल यांचे ते बंधू होत. कन्नुभाई मश्रुवाला यांच्या पश्चात मुलगा डॉ. मुकुंद, पुतण्या प्रियदर्शी, मुली डॉ. मुक्ता (इंग्लंड), डॉ. रूपल कोठेकर व डॉ. स्वाती पावडे (नागपूर येथे स्त्री रोग चिकित्सक) आहेत. महात्मा गांधी यांचे पुत्र मणिलाल यांच्याशी कन्नुभाईंच्या बहिणीचा विवाह झाला होता. त्यांची दुसरी बहिण ताराबेन यांनी सर्वोदय आश्रम काढून समाजसेवेला आपले जीवन समर्पित केले. अशाप्रकारे गांधी परिवाराशी अकोल्याची नाळ जुळली होती. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या वडिलांचे कन्नुभाई हे मामा होत. अकोल्यातील स्वातंत्र्य चळवळीतही ते सक्रिय होते. स्वदेशी शिक्षणाची मुहूर्तमेढ टिळक शाळेच्या स्थापनेने अकोल्यात झाली. कन्नुभाई मश्रुवाला यांनी टिळक राष्ट्रीय शाळेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली होती. त्यांच्या निधनाने अकोला जिल्ह्यातील सर्वोदय मंडळ व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

तारुण्यात घेतली होती लढ्यात उडी
ऐन तारुण्यातच कन्नुभाईंनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली होती. 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य लढ्यातच मुंबई येथे आंदोलन करताना कन्नुभाई व त्यांचे बंधू कांतिभाई यांना ब्रिटिशांनी अटक केली होती. त्यांना सहा महिन्यांचा कारावासही झाला होता. मश्रुवाला कुटुंब हे मुळचे गुजरातमधील सुरतचे, 1888 साली ते कापसाच्या व्यापारानिमित्त अकोल्यात आले. कन्नुभाई यांचे वडील नानाभाई हे कापसाचा व्यापार करीत होते. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार करणे. सर्वोदयी कार्यकर्ते तयार करणे व स्वातंत्र्य लढ्यात योग्य ती जबाबादारी पार पाडण्याचे काम हे कुटुंबिय करीत असत. त्यांचा संस्कार कन्नुभाई यांच्यावर झाला होता. स्वातंत्र्य सेनानी असले तरी आपल्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होऊ नये अशीच त्यांची इच्छा होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com