दीक्षाभूमी परिसरात जेवण करीत असताना उपासकांना हाकलले

 दीक्षाभूमी परिसरात जेवण करीत असताना उपासकांना हाकलले

नागपूर : 14 ऑक्‍टोबर, रात्रीचे अकरा वाजता असताना अचानक पोलिसांनी दीक्षाभूमी परिसरात असलेल्या उपासकांना हाकलण्यास सुरुवात केली. उपासकांचे सहभोजन सुरू असताना विद्युत यंत्रणा बंद केली. "चला, बाहेर निघा' असे म्हणत अक्षरशः पिटाळून लावण्याचा प्रयत्न झाला. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना विरोध केला असता, स्मारक समितीच्या आदेशानुसार प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत तीव्र शद्बात निषेध करीत दीक्षाभूमी ही जनतेचा श्‍वास आहे. आंबेडकरी जनतेच्या प्राणवायूचे आगार असलेल्या दीक्षाभूमीतून स्मारक समिती बरखास्त करावी, अशी मागणी केली. 
दीक्षाभूमीतून बाहेर काढण्याचा अधिकार स्मारक समितीला नसून ही समिती बरखास्त करीत देशभरातील आंबेडकरी विचारवंतांचा यात समावेश करावा, अशीही मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. सोमवारी मध्यरात्रीपासून जनतेला दीक्षाभूमीतून हुसकावून लावण्याचा स्मारक समितीचा प्रयत्न फसला असून नंतर मात्र यासंदर्भात अळीमिळी गुपचिळीची भूमिका घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न स्मारक समितीने केला. 14 ऑक्‍टोबर हा ऐतिहासिक अशा बाबासाहेबांच्या छप्पन्नच्या धम्मक्रांतीचा वर्धापनदिन आहे. लाखो बांधव दीक्षाभूमीवर कुटुंबीयांसह रात्री उशिरापर्यंत हजेरी लावतात. स्मारकातील बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला अभिवादन करतात. दिवस व रात्री उशिरापर्यंत वेळ घालवितात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा आहे. मात्र दरवर्षी कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावावर येथील उपासकांना हाकलण्यात येत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित जनतेनेही केला. पत्रकार परिषदेला प्रकाश दार्शनिक, सुनील सारीपुत्त, कांचन वासनिक, दिपांकर सहारे, सुदर्शन गेडाम, गोपाल बागडे, डॉ. अनिल दवडे, अश्विनी खोब्रागडे उपस्थित होते. 
स्मारकाला लावले टाळे 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला अभिवादन करण्यासाठी अनेक जिल्ह्यांतून उपासक आले होते. अमरावतीवरून आलेल्या मीना काळे यांचे कुटुंब जेवण करीत होते. जेवण करताना परिसरातील विद्युत यंत्रणा बंद केल्यामुळे त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. रात्री बारा वाजता दीक्षाभूमीवरील स्मारकाला कुलूप लावण्यात आले, अशी माहिती समता सैनिक दलाचे प्रकाश दार्शनिक, सुनील सारिपुत्त यांनी दिली. देशभरातील समता सैनिक दलाचे सैनिक आंदोलनासाठी दीक्षाभूमीवर येतील, असा इशारा सुनील सारीपुत्त यांनी दिला. 
अशोक विजयादशमीला दोन दिवसांपासून नागरिक येतात. 14 ऑक्‍टोबरला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी परिसर रिकामा करावा लागला अशी भूमिका घेतली. पुढील वर्षी पोलिसांसोबत संपर्क साधून पोलिसांनी सुरक्षा प्रदान केल्यास येत्या 14 ऑक्‍टोबरला रात्रभर खुली ठेवण्यात येईल. 
-एन. आर. सुटे, सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com