अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) - घरकुलाच्या कारणावरून उद्भवलेल्या वादानंतर एकाच घरातील वृद्ध आईसह दोन मुली आणि एक नातू असे चौघे गंभीररीत्या भाजले गेल्याची घटना गुरुवारी (ता. 17) काळगव्हाण (ता. अंजनगावसुर्जी) गावात घडली. दोघींची प्रकृती चिंताजनक असून, त्या मृत्यूशी झुंज देत आहेत.
मंदा दीपक देशमुख (वय 40), शीला विलास सदार (वय 45) या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. शशिकला वासुदेव कोरडे (वय 65) व कुलदीप विलास सदार (वय 22, सर्व रा. काळगव्हाण) अशी जखमींची नावे असून, चौघांवरही अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी मंदा आणि शीला या दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. सकाळी घरात स्वयंपाक सुरू असताना ही घटना घडल्याचे नातेवाइकांचे म्हणणे होते. एकाच घरातील चार जण एकाच वेळी कसे भाजले गेले, याचा शोध पोलिस घेत आहेत.
|