वसंतराव नाईक कृषी पुरस्काराचे वितरण

File photo
File photo

पुसद (जि. यवतमाळ) : "देशातील अन्नधान्याचे पारतंत्र्य दूर करण्यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेती तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदा लोकांपर्यंत नेला आणि देशाला अन्नधान्याची स्वयंपूर्णता मिळवून दिली. वसंतरावांची दूरदृष्टी, इच्छाशक्ती व मेहनतीतून हरित क्रांतीची पहाट उगवली. वसंतराव नाईक हे केवळ महाराष्ट्राला नव्हे, तर देशाला मिळालेली देणगी होय,' असे भावोत्कट विचार दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्र, नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त मायी यांनी व्यक्त केले.
येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे रविवारी (ता. 18) आयोजित वसंतराव नाईक यांच्या 40व्या स्मृतिदिनानिमित्त वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. मायी अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी महाराष्ट्रातील नऊ कर्तबगार, प्रगतिशील शेतकरी व कृषिशास्त्रज्ञांचा शाल, श्रीफळ, स्मृती मानचिन्ह व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशीष पातूरकर, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आमदार मनोहर नाईक, माजी राज्यमंत्री डॉ. एन. पी. हिराणी, माजी आमदार विजय पाटील-चोंढीकर, आमदार नीलय नाईक, प्रतिष्ठानचे कोशाध्यक्ष जय नाईक, माजी खासदार सदाशिव ठाकरे, के. डी. जाधव, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिभूषण दीपक आसेगावकर, प्रा. गोविंद फुके, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष धनंजय सोनी, सचिव डॉ. उत्तम रुद्रवार, संचालक प्रा. अप्पाराव चिरडे, डॉ. अकील मेमन, निळकंठ पाटील, सिराज हिराणी, अनिरुद्ध पाटील, विजय जाधव, सूतगिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, जि. प. सदस्य अमेय नाईक, डॉ. हेमा मायी उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षांत शेतमाल निर्यातीचा दर 20 टक्‍क्‍यांनी कमी झाला, याबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी निर्यातीचे धोरण सक्षम करण्याची गरज व्यक्त केली. राजकीय इच्छाशक्ती, गटशेतीचा प्रयोग याद्वारे या प्रश्‍नावर मात करता येईल, असे डॉ. मायी म्हणाले. नाईक साहेबांच्या काळातील कृषी विभागाची प्रबळ "एक्‍स्टेंशन सिस्टिम' अलीकडे विस्कळीत झाली असल्याचा घणाघात त्यांनी केला. ग्राहकाच्या मागणीनुसार शेतमाल उत्पादनात बदल केला पाहिजे, असे सांगून त्यांनी सत्कारमूर्ती शेतकरी कृषी क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतील, अशी अपेक्षा डॉ. मायी यांनी व्यक्त केली. कुलगुरू आशीष पातुरकर यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. दिनकर गुल्हाने व प्राचार्य गणेश पाटील यांनी संपादित केलेल्या "किमयागार' या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. मायी यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक दीपक आसेगावकर यांनी केले. प्रा. चंद्रकिरण घाटे यांनी वंदनगीत म्हटले. सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण व माधुरी आसेगावकर यांनी केले. डॉ. उत्तम रुद्रवार यांनी आभार मानले. साधना मोहोड यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सत्कारमूर्ती शेतकरी
अनुभव मांजरेकर बदलापूर (ठाणे), डॉ. संदीप चोपडे संगमेश्वर (रत्नागिरी), अशोक भाकरे धामोरी (अहमदनगर), अतुल तांबे तांबेवाडी (अहमदनगर), मेघा विलास देशमुख-सावंत झरी (परभणी), अभिजित वाडेकर मंगूजळगाव (जालना), किशोर राठोड काटखेडा (यवतमाळ), दादाराव गायर ब्राह्मणवाडा थडी (अमरावती), राहुल रौंदळे निमखेड बाजार (अमरावती), कृषिशास्त्रज्ञ राजेश्वर शेळके (अकोला).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com