पाळीव श्‍वानांची मुक्तपणे हागणदारी!

रामेश्‍वरी - घरांच्या पुढेच रस्त्यावर श्‍वानाला ‘हलके’ करणारा श्‍वानप्रेमी.
रामेश्‍वरी - घरांच्या पुढेच रस्त्यावर श्‍वानाला ‘हलके’ करणारा श्‍वानप्रेमी.

नागपूर - केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिकेकडून परिश्रम घेतले जात असतानाच शहरातील रिंग रोडसह विविध वस्त्यांतील मोठे रस्ते, मैदानांच्या बाजूला पाळीव श्‍वानांची मुक्‍तपणे हागणदारी सुरू आहे.

महापालिकेने श्‍वान मालकांवरील कारवाई थंडबस्त्यात टाकल्याने शहराच्या सर्वच भागात स्वच्छतेची वाट लागली आहे. एकीकडे हागणदारी मुक्त शहरासाठी शौचालयांवर कोट्यवधी खर्च केले जात आहेत, त्याचवेळी दुसरीकडे श्‍वान मालकांना संपूर्ण शहरच श्‍वानांच्या हागणदारीसाठी मुक्त असल्याचे चित्र आहे. 

हिवाळा येताच आरोग्याविषयी जागरूक नागरिक सकाळी फिरायला दिसतात. मात्र, यात मोठ्या प्रमाणात श्‍वानांना ‘हलके’ करण्यासाठी फिरणारे दिसून येत आहेत. श्‍वान रस्त्यांवरच ‘हलके’ होत असल्याने सकाळी व सायंकाळी आरोग्यासाठी फिरणारे नागरिकही त्रस्त आहेत.

भगवाननगरातील मोकळे मैदान, ग्रेट नाग रोड, दत्तात्रयनगर उद्यानांचा बाजूचा परिसर, मानेवाडा रोड, रिंग रोड, कामठी रोड, अमरावती रोड, छिंदवाडा रोड, सिव्हिल लाइन्स येथील रस्ते, शंकरनगर, मानकापूर ते गोधनी रोड, सेंट्रल एव्हेन्यू, जुना भंडारा रोड यांसह अनेक प्रमुख व वस्त्यांतील रस्त्यांवर अनेक श्‍वान मालक श्‍वानाला घेऊन दिसून येतात. या श्‍वान मालकांना रस्ते कमी पडले असून आता नरेंद्रनगर, लष्करीबागसह इतर उड्डाणपुलावरही सकाळी व सायंकाळी श्‍वान घाण करताना दिसून येतात. रस्त्यावर, मोकळ्या जमिनीवर, उद्यानाच्या बाजूलाच पाळीव श्‍वान अस्वच्छता करताना दिसतात. त्यामुळे अनेक जण फिरण्याचा रस्ता बदलतात. परंतु, किती रस्ते बदलायचे, असा प्रश्‍न त्यांनाही पडू लागला आहे. काही वर्षांपूर्वी महापालिकेने श्‍वानांना प्रातर्विधीसाठी फिरायला घेऊन येणाऱ्यांवर दंड आकारणे सुरू केले होते. त्यामुळे पाळीव श्‍वानांच्या अस्वच्छतेवर काही प्रमाणात नियंत्रण आले होते. 

मात्र, महापालिकेची दंडात्मक कारवाई क्षणभंगुर ठरली. ही कारवाई आता पूर्णपणे थंडबस्त्यात गेल्याने श्‍वान मालकांची हिंमत वाढली असून, आता उद्यानांत फिरायला येण्याचे निमित्त करून बाजूलाच श्‍वानांची सोय करून देतात. त्यामुळे सकाळचे आरोग्यदायी वातावरण दूषित होत आहे.

श्‍वान मालकांची अनभिज्ञता लोकांच्या मुळावर 
श्‍वान पाळणे अतिशय जबाबदारीचे काम आहे. सामाजिक भान ठेवूनच श्‍वान पाळण्याची गरज आहे. परंतु स्वच्छता, इतरांना होणारा त्रास, याबाबत श्‍वानमालक अनभिज्ञ आहेत. श्‍वानांना घरांतील शौचालयातही नेणे शक्‍य असल्याची साधी प्राथमिक माहितीही त्यांना नाही.

शोधपथक केवळ प्लॅस्टिकबंदी कारवाईसाठी 
शहर स्वच्छ राहावे या हेतूने महापालिकेने उपद्रव शोध पथक स्थापन करून स्वच्छतादूतांची नियुक्ती केली. अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर दंडाची कारवाई करण्यास नेमलेले स्वच्छतादूत सध्या प्लॅस्टिकबंदीच्या कारवाईत गुंतले असून श्‍वानांची घाण विस्मरणात गेली.

याबाबत झोन अधिकाऱ्यांची बैठक बोलावून तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या जाईल. श्‍वानमालकांनी श्‍वानांना घरीच प्रातःविधीची सवय लावावी. त्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे, शहराची अस्वच्छता कुठल्याही स्थितीत सहन केली जाणार नाही. 
- डॉ. सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता), महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com