पोट भरणारे पीक नको, खिसे भरणारे उत्पन्न घ्यावे 

पोट भरणारे पीक नको, खिसे भरणारे उत्पन्न घ्यावे 

गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत, पाण्याची कमी नाही, मात्र धान उत्पन्नाशिवाय दुसरे पीक घेतले जात नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे पोट भरणारी शेती न करता खिसे भरणाऱ्या उत्पादनावर भर द्यावा, असे आवाहन आत्माचे संचालक डॉ. प्रकाश पवार यांनी केले. 

गडचिरोली येथील कृषी संशोधन केंद्र, जिल्हा नावीन्यता परिषद, कृषी महाविद्यालय व कृषी विज्ञान केंद्राच्या सयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. 24) कृषी संशोधन केंद्राच्या परिसरात आयोजित केलेल्या शेतकरी मेळावा व चर्चासत्राच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी शिक्षण व विस्तार संचालक डॉ. पी. जी. इंगोले, कृषी संशोधन केंद्राचे गणेश गणवीर, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे आत्माचे उपसंचालक प्रीती हिरडकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य अमरशेट्टीवार, योगिता सानप, प्रगतिशील शेतकरी प्रतिभा चौधरी, सोनाली पुण्यपवार उपस्थित होते. 

डॉ. पवार पुढे म्हणाले, विज्ञान व तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगती प्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या पारंपरिक शेतीला बगल देत शेती करणे गरजेचे आहे. वाढत्या महागाईच्या काळाच रासायनिक खताच्या वापरामुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पन्नही कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर दिला तर खर्च कमी होईल व उत्पन्नातही वाढ होईल, मराठवाड्याप्रमाणेच धान उत्पादक शेतकऱ्यांनी एकात्मिक शेतीवर भर दिला पाहिजे. शेतीसोबतच जोडधंदा म्हणून कुक्‍कुटपालन, बदकपालन, मच्छपालनाचा व्यवसाय केला तर आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी मदत होईल, जंगली जनावरांच्या त्रासामुळे पिकांचे नुकसान होत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून केली जाते, मात्र बारमाही शेती केल्यास हा त्रास कमी होईल, असे डॉ. पवार यावेळी म्हणाले. 

कार्यक्रमाचे संचालन डॉ. वाघमारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. डी. एन. अनोरकर  यांनी मानले. मेळाव्यासाठी डॉ. सुधार बोरकर, डॉ. मनोहर इंगोले, डॉ. शुभांगी अलेक्‍झांडर, डॉ. विपीन बाभूळकर प्रा. डी. एन. अनेकार, प्रा. डी. टी. उंद्रटवाड तथा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. 

शिवाराची पाहणी 
शेतकरी मेळाव्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात घेत असलेल्या विविध पिकांची पाहणी केली. यावेळी कृषितज्ज्ञांनी शेतकऱ्यांना संशोधित केलेल्या वाणाबद्दल 
माहिती दिली. त्यानंतर शेतीच्या उत्पन्नात वाढ कशी करता येईल, पीकपद्धतीत झालेले बदल 
व शासनाच्या योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच समस्येवर चर्चा करण्यात 
आली. मेळाव्याला जिल्हाभरातून शेकडो प्रगतिशिल शेतकरी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com