जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करा

Drought
Drought

नागपूर - जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दुष्काळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना सरकारने तीनच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले.

सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका विरोधकांनी केला. तर तीन तालुक्‍यांची निवड अधिकाऱ्यांच्या अहवालावरून केल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांनी सरकारची पाठराखण केली. जिल्ह्याची स्थिती लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव सभेत सर्वानुमते घेण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश अध्यक्ष सावरकर यांनी दिले.
सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला. सरकारने अलीकडेच राज्यातील पावणेदोनशेहून अधिक तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे घोषित केले. यात नागपुरातील काटोल, कळमेश्वर आणि नरखेड या तीन तालुक्‍यांचा समावेश आहे.

दुष्काळाची गंभीरता कशी मोजली आणि दुष्काळ मंडळ कोणत्या निकषांवर स्थापित केले, यावर आक्षेप घेतला. त्यांनी हवामान खात्याच्या आकडेवारीवर आक्षेप घेत, जिल्ह्यात सर्वदूर  दुष्काळाचे सावट आहे.

सोयाबीन आणि कापसाचा सत्यानाश होण्याची स्थिती असताना सरकारने तीनच तालुक्‍यात दुष्काळ जाहीर केल्याची टीका मनोहर कुंभारे, चंद्रशेखर चिखले आणि मनोज तितरमाने यांनी केली. शासनाचे निकष चुकीचे असल्याचे ते म्हणाले.  यावर सत्ताधारी सदस्य रूपराव शिंगणे आणि जयकुमार वर्मा यांनी हरकत घेतली. 

तीन तालुक्‍यांची निवड सरकारने स्वत: नाही तर; अधिकाऱ्यांच्या अहवालावरून केल्याचे सांगितले. यावरून  दोन्ही बाकांवरील सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दुष्काळ जाहीर करण्याचे निकष सांगत शासनाच्या आदेशावरून तीन तालुक्‍यांची निवड केल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेच्या नंदा लोहबरे म्हणाल्या, अपुऱ्या पावसामुळे आणि धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा धान पिकले नाही. अध्यक्ष शेतकरीविरोधी असल्याचा आरोप भारती गोडबोले यांनी केला. शोभा झाडे, उज्ज्वला बोढारे, शांता कुमरे, उपासराव भुते, छाया ढोले आदी सदस्यांनी तालुक्‍यातील परिस्थिती सभागृहापुढे मांडली. 

फेरतपासणी करा
दुष्काळासंदर्भात करण्यात आलेले सर्वेक्षण चुकीचे आहे. त्यामुळे हे फेरसर्वेक्षण करण्याची सूचना वित्त सभापती उकेश चव्हाण यांनी केली. सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव एकमताने घेण्याची सूचना उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com