श्रावणबाळ योजनेच्या अनुदानापासून वृद्ध दाम्पत्य वंचितच; उदरनिर्वाहाचा प्रश्‍न कायम

file photo
file photo

तिवसा (जि. अमरावती)  : श्रावणबाळ योजना अनुदान हे ६५ वर्षांखालील महिला व पुरुष वर्गाकरिता असून याचा लाभ हा तहसील कार्यालय स्तरावर घेतला जातो. मात्र याच अनुदानापासून तिवसा तालुक्‍यातील शिरजगाव मोझरी येथील वृद्ध दाम्पत्य गेल्या तीन वर्षांपासून वंचित आहेत. ते प्रशासनापुढे अनुदानकरिता दयायाचना करीत आहेत, तर इतके वर्षे या अनुदानपासून का वंचित ठेवण्यात आले? असा सवाल हे वृद्ध दाम्पत्य करीत आहेत.

ज्या व्यक्तीचे वय ६५ व ६५ वर्षांवरील आहे व त्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांच्या आत आहे, अशा व्यक्तींना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य अनुदान योजना (गट अ) अंतर्गत ६०० रुपये प्रतीमाह निवृत्तिवेतन देण्यात येते. ज्यांचे नाव दारिद्र्यरेषेखालील यादीत आहे, अशा ६५ व त्यावरील वृद्धांना श्रावणबाळ सेवा राज्य सेवानिवृत्ती योजना गट-ब मधून ४०० रुपये प्रतीमाह प्रतिलाभार्थी निवृत्तिवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते.

याचा लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेचे २०० रुपये प्रतीमाह प्रती लाभार्थी निवृत्तिवेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून ४०० रुपये व केंद्र शासनाकडून २०० रुपये, असे एकूण ६०० रुपये प्रतीमाह प्रती लाभार्थी निवृत्तिवेतन मिळते. ही योजना सर्वसामान्य नागरिक, वयोवृद्ध लोकांकरिता तहसील कार्यालयामार्फत राबविली जाते.

अल्पशेतीवरच उदरनिर्वाह

मात्र तिवसा तहसीलच्या एका चुकीच्या अहवालामुळे ७५ वर्षे पार झालेल्या वृद्ध दाम्पत्यांचे तीन वर्षांपासून श्रावण बाळ योजनेचे अनुदानच बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तम बळीराम फटिंग (वय ७५) तर त्यांच्या पत्नी सरस्वती उत्तम फटिंग (वय ७०) असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव असून त्यांच्याकडे स्वतःची काही शेती असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

आधी मिळत असलेल्या अनुदानामुळे त्यांना थोडा हातभार लागत होता. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हे अनुदान रोखल्याने इतक्‍या वयात उदरनिर्वाह करण्यासाठी अडचणीचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे श्रावणबाळ योजनेचे अनुदान मिळविण्याकरिता हे वृद्ध आजही तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. तीन वर्षांपर्यंत आमचे अनुदान का रोखण्यात आले, हा सवाल या वृद्ध दाम्पत्याकडून उपस्थित केला जात आहे.

तीन-चार वर्षांपासून अनुदान बंद
गेल्या तीन-चार वर्षांपासून आमचे अनुदान बंद आहे. वयाच्या ७५ व्यावर्षी सुद्धा श्रावणबाळचे अनुदान मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. माझ्याकडे दोन एकर शेती असून शेतीवरच उदरनिर्वाह होतो. तेव्हा प्रशासनाने सांगावे की ही योजना नेमकी कुणाला लागू होते.
- उत्तम फटिंग, शिरजगाव मोझरी.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com