कोरची (जि. गडचिरोली) : वीज ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. परंतु, एकीकडे विकासाच्या मोठमोठ्या बाता केल्या जात असताना कोरची तालुक्यात अद्यापही स्थानिकांना विजेसाठी संघर्ष करावा लागतोय. एरवी दररोज ये-जा करणारी वीज कधी कधी तब्बल दोन-दोन दिवस नसते. त्यामुळे स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिमेस छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त कोरची तालुक्यात वीजप्रश्न कायमचा सुटावा म्हणून तालुका निर्मितीपासून अनेकदा सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.
तालुका विकास आंदोलन समितीने मोर्चे, चक्काजाम आंदोलन, तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी सामूहिक राजीनामे दिले. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. असे एक ना अनेकवेळा आंदोलन करूनही वीज वितरण कंपनीने अद्याप तालुक्यात विद्युत पुरवठा सुरळीत केलेला नाही. तालुक्याला मिळणारी वीज घनदाट जंगलातून येत असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचे कारण सांगितले जाते. समस्येचे मूळ काय, हे माहिती असताना एकच प्रश्न वर्षानुवर्षांपासून रेंगाळत असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी करतात तरी काय हा प्रश्न पडतो. विजेअभावी नागरिकांची कामे खोळंबतात. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न तातडीने सोडवावा.
मागील वर्षी ४ ऑगस्ट २०२० रोजी सर्वपक्षीय तालुका विकास आंदोलन समितीने झंकार गोंदी फाट्यावर चक्काजाम आंदोलन केले. यावेळी आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्व केले. विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, तहसीलदार यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री, ऊर्जामंत्री यांच्याशी बोलणी करून कोरची तालुक्यात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन देऊन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऊर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री एकनाथ शिंदे, विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांच्यासोबत सर्वपक्षीय विकास आंदोलन समितीचे पदाधिकारी, क्षेत्राचे आमदार यांच्यासमक्ष वरिष्ठांनी तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या; परंतु वर्ष लोटूनही समस्या कायम आहे.
९० गावांत अंधेरा कायम रहे!
कुरखेडा, कोरचीहून आणला जाणारा विद्युत पुरवठा घनदाट जंगलातून येत असल्याने वीज पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे ऊर्जामंत्री व मुख्य अभियंता यांनी गोंदिया जिल्ह्यातून येत असलेल्या सब सेंटरच्या सर्व अधिकाऱ्यांना कोरचीचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. परंतु गोंदिया जिल्ह्यातील अधिकारी गडचिरोली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना जुमानत नाही. त्यामुळे वीज पुरवठा वाट्टेल तेव्हा सुरू आणि वाट्टेल तेव्हा बंद करतात. त्यामुळे कोरची तालुक्यातील ९० गावांतील नागरिकांना दोन दोन दिवस विजेविना काढावे लागतात.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.