गडचिरोलीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅलीवर भर

File photo
File photo

गडचिरोली : बघता बघता विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख आली असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी (ता. 19) अनेक राजकीय पक्षांनी प्रचार रॅलीवर भर दिला. आता उद्या, सोमवारी (ता. 21) मतदान होणार असून मतदानाच्या एक दिवसाआधीची रविवारची रात्र उमेदवारांसाठी "वैऱ्याची रात्र' ठरणार आहे. मतदानाच्या आदल्या रात्री मोठ्या प्रमाणात मतांसाठी आटापिटा होत असल्याने ही रात्र वैऱ्याची मानली जाते. त्यामुळे रविवारी अनेक राजकीय घडमोडी घडल्या.
प्रचाराच्या अखरेच्या दिवशी अनेक राजकीय पक्षांनी प्रचार रॅली काढली. शहरातून निघालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या रॅलीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. खरेतर भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेससारखे बलाढ्य पक्ष असतानाही येथे शेतकरी कामगार पक्षाने प्रचारात चांगली रंगत आणली आहे. शनिवारची रॅलीसुद्धा भव्य होती. स्थानिक इंदिरा गांधी चौकापासून पटवारी भवनापर्यंत जवळपास अर्धा किमीची रॅली होती. विशेष म्हणजे, या रॅलीत महिलांची संख्या मोठी होती. या रॅलीच्या पुढे बैलगाडीवर उमेदवार जयश्री वेळदा होत्या; तर मागे तीन, चारच्या रांगेत लाल टोपी आणि पक्षाचा लाल झेंडा घेतलेले कार्यकर्ते होते. भाजपचे उमेदवार डॉ. देवराव होळी यांनीही प्रचार रॅलीवर भर दिला. त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ज्युनिअर शाहरुख खानला आमंत्रित केले होते. शुक्रवारी रात्री कॉंग्रेस उमेदवार डॉ. चंदा कोडवते यांनीही प्रचार रॅली काढून परिसर पिंजून काढला. पण, त्यांच्या रॅलीत फारशी गर्दी दिसून आली नाही. अहेरी, आरमोरी विधानसभेतही मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार रॅलींवर भर देण्यात आला. गडचिरोली विधानसभेत भाजपचे डॉ. देवराव होळी, कॉंग्रेसच्या डॉ. चंदा कोडवते व शेकापच्या जयश्री वेळदा, आरमोरी विधानसभेत कॉंग्रेसचे आनंदराव गेडाम, भाजपचे कृष्णा गजबे व अपक्ष सुरेंद्रसिंह चंदेल आणि अहेरी विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम, कॉंग्रेसचे दीपक आत्राम व भाजपचे अम्ब्रीशराव आत्राम यांच्यात काट्याची टक्‍कर होणार आहे. आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून विविध राजकीय पक्षांची मतदान आपल्याकडे वळविण्याची रणनीती सुरू झाली आहे. मतदानाच्या दिवसाची पूर्वसंध्या विशेषत: रात्र अतिशय महत्त्वाची मानली जाते. या एकाच रात्रीत अनेकदा विरोधी उमेदवाराच्या पारड्यातील मते आपल्या पारड्यात टाकण्याची किमया काही राजकारणी साधतात. त्यामुळे या रात्री अनेक राजकीय घडमोडी घडत आहेत.
---
कार्यकर्त्यांना आले महत्त्व
मतदानाच्या आदल्या दिवशी सर्वाधिक महत्त्वाची भूमिका कार्यकर्त्यांची असते. एरवी गर्दी जमवणे, सतरंज्या उचलणे, घोषणा देण्याचे काम करणारे हे कार्यकर्ते लोकांचे मत परिवर्तन करण्यात वाकबगार असतात. या कार्यकर्त्यांचा लोकांशी थेट संपर्क असल्याने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपविल्या जातात. याच काळात आर्थिक व्यवहारही मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे पोलिस विभागाचीही सर्व घडामोडींवर तीक्ष्ण नजर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com