दहा कुटुंबांचा घराकडे परतण्यास नकार

File photo
File photo

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या भीतीने गाव सोडलेल्या व सध्या पोलिस ठाण्याच्या आश्रयाला असलेल्या कसनासूर गावातील दहा कुटुंबांनी गावात जाण्यास नकार दिला आहे. यामुळे पोलिस प्रशासनापुढे पेच निर्माण झाला असून घटनेच्या तीन दिवसांनंतरही दहशतीचे वातावरण असल्याने नागरिक प्रचंड धास्तावले आहेत.
वर्षभरापूर्वी पोलिस-नक्षल चकमकीत 40 नक्षली ठार झाले होते. तेव्हापासून कसनासूर गाव नक्षलवाद्यांच्या "टारगेट'वर होते. त्यामुळे त्यांच्या खबऱ्यांकडून पोलिसांना माहिती देणाऱ्यांचा शोध सुरू होता. यात मालू दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी व लालसू मासा कुडयेटी यांच्यासह सहा गावकऱ्यांची नावे समोर आल्यानंतर संतापलेल्या नक्षलवाद्यांनी शंभरावर नक्षल्यांसह कसनासूर गावाला वेढा घातला, मारपीट केली व सहाही संशयित पोलिस खबऱ्यांचे अपहरण केले. त्यानंतर मालू, कन्ना व लालसू या तिघांची निर्घृण हत्या केली व त्यांचे मृतदेह रस्त्यावर फेकून दिले होते. विनोद तलांडी, दलसू बोगा व मुन्ना मडावी या तिघांना मात्र नक्षल्यांनी सोडून दिले.
तिघांच्या हत्येनंतर कसनासूर गाव प्रचंड दहशतीत आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावात नेण्याचीही त्यांची हिंमत नव्हती. त्यामुळे त्यांनी तीनही मृतदेहांवर ताडगावातच अंत्यसंस्कार केले. एवढेच नाही तर दीडशेच्या जवळपास गावकरी मागील तीन दिवसांपासून ताडगाव पोलिस ठाण्यातच आश्रयाला आहेत. घटनेच्या संदर्भात ताडगाव पोलिसांनी कसनासूर ग्रामस्थांचे बयाण नोंदवले असून आज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन पीडितांशी चर्चा केली, त्यांची समजूत काढली व त्यांना हिंमत दिली. त्यानंतर गुरुवारी (ता.24) दुपारी गावकऱ्यांनी आपल्या गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, गावात पोहोचण्यास रात्र होण्याची शक्‍यता असल्याने ते शुक्रवारी (ता.25) सकाळी कसनासूरला जाणार आहेत. मात्र, हत्या झालेल्या तसेच अपहरण झालेल्या व्यक्तींच्या जवळपास दहा कुटुंबांनी कसनासूर गावात जाण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.
कुठे आहेत मानवाधिकारी?
गेल्या वर्षी कसनासूर गावालगत झालेल्या चकमकीत 40 नक्षलवादी ठार झाल्याच्या घटनेनंतर काही मानवाधिकार संघटनांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवून निष्पाप लोक मारल्या गेल्याची ओरड केली होती. मात्र, आता तीन लोकांची हत्येबाबत या संघटना मौन बाळगून का आहेत, असा सवाल "भूमकाल' संघटनेने केला असून पोलिस प्रशासनावरही ताशेरे ओढले. कसनासूर गाव नक्षलवाद्यांच्या रडारवर असल्याचे माहिती पोलिसांना होती. तरीही तेथे सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही, असेही "भूमकाल'ने पत्रकात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com