संग्रामपूर (जि.बुलडाणा) : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनचा फटका टोमॅटो उत्पादकांना चांगलाच नुकसानकारक ठरत आहे. वानखेड येथील शेतकऱ्याने 29 मार्च रोजी शेतातून काढलेले जवळपास 60 कॅरेट टोमॅटो विक्री झाले नाहीत म्हणून फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
शेती व्यवसायाला सुगीचे दिवस येतील या आशेने शेतकरी वर्ग वेगवेगळ्या कल्पकतेतून विविध पिकांचे उत्पादन घेण्यावर भर देत आहे. मात्र, निसर्ग साथीला नसल्याने या भागातील शेतकरी गारद होतानाचे चित्र आहे. संग्रामपूर तालुका खारपट्ट्यात मोडणारा भाग असल्याने उत्पादन घेताना मशागत पासूनच खर्च पाहता पिकाचे येणारे उत्पन्न याचा ताळमेळ लागतच नाही. परिणामी, या भागात आर्थिक दृष्ट्या मागासलेपण कायमच आहे. असे असतानाही बरेच युवक शेतीला व्यवसायाचे स्वरूप देऊन पीक उत्पादित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, आसमानी आणि सुलतानी संकट काही करून शेतीला फायद्याचे ठरू देत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
महत्त्वाची बातमी - म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू होम क्वारंटाईन
वानखेड गावात मनोज हागे आणि दीपक हागे या दोन युवकांनी मोठ्या आशेने ठोक्याने शेती करून जवळपास पाच एकर टोमॅटो लागवड केली. त्यासाठी लागणारा महागडा खर्च करून पीक बहारात ही आले. पाच एकरात टोमॅटो विक्रीला येईपर्यत जवळपास पाच लाख रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे. उसनवारी आणि उधारी करून सर्व काही केले व पीक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत असताना कोरोना आला आणि यात मोठमोठ्या बाजारपेठ बंद पडल्याने हा माल विकावा तरी कोठे हाच गंभीर प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
माल घेणारे कोणी नाही
अश्यातच 29 मार्च रोजी 60 कॅरेट टोमॅटो फेकून द्यावे लागले. कारण सर्वत्र लॉकडाउन असल्याने मोठ्या प्रमाणात माल घेणारे नाही. झालेला खर्च निघावा तरी कसा याच चिंतेत हे दोघे अडकून असल्याची माहिती आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.