मॉन्सून बरसल्यानंतर सुरू झाली बळीराजाची पेरणीची लगबग

kharip
kharip

पवनी  (जि. भंडारा) : यंदा मॉन्सून वेळेवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदीआनंद आहे आणि पेरणीची लगबग सुरू झाली आहे. नांगरून वखरून ठेवलेल्या शेतात आता बी पेरले जाईल आणि पावसाच्या सरी कोसळल्या की हिरवे अंकूर जमिनीतून फोफावतील. त्या हिरव्या स्वप्नासाठी शेतकरी आता कंबर कसून कामाला लागला आहे.
मॉन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे तालुक्‍यात खरीप हंगामाला वेग आला आहे. शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपली असून पेरणीची तयारी सुरू केली आहे. सध्या धान बियाणे व खते खरेदी करण्यासाठी त्यांची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे.
पवनी तालुका हा चौरास पट्टा म्हणून ओळखला जातो. सिंचनाची सुविधा व पर्जन्यमानामुळे परिसरातील शेतकरी धान लागवडीत आघाडीवर असतात. तालुक्‍यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र 33 हजार हेक्‍टर इतके आहे. मागच्या वर्षी 27 हजार हेक्‍टरमध्ये पेरणी झाली होती. पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पादन झाले. या हंगामातही चांगल्या पावसाचे संकेत आहेत. त्यामुळे शेतकरी जोमाने कामाला लागले आहेत. खरीपपूर्व कामे आटोपली असून शेतकरी धान, तूर व सोयाबीन घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रात हजेरी लावत आहेत. आधारभूत केंद्रावर बारीक व ठोकळ धानाला सारखा भाव असल्याने ठोकर धान लागवड फायदेशीर असल्याचे येनोळा येथील शेतकरी संजय बावनकर यांनी सांगितले.

ठोकळ धानाला पसंती
शेतकरी बारीक व ठोकळ अशा दोन्ही वाणाच्या धानाची लागवड करतात. बारीक धानाला अधिक पाणी जोपासनेची गरज असते. किडींचाही प्रादुर्भाव अधिक होतो. तुलनेत ठोकळ (सर्वसाधारण) धानाला कमी खर्च येतो व उत्पादनही अधिक मिळते. तसेच आधारभूत केंद्रावर शासनाने धानाला 1815 रुपये क्विंटल हमीभाव व बोनस दिला. त्यामुळे ठोकळ धानाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल जास्त असल्याचे दिसते. ठोकळ धानाच्या वाणामध्ये बाहुबली, अहिल्या, एकविरा, 1110, ऐश्वर्या असे अनेक कंपन्यांची बियाणे विक्रीस आहेत. बारीक धानाच्या वाणात प्रणाली 77, सुमन, देवकी, जय श्रीराम, ओमसाई, शतायु, बलवान असे विविध धान बियाणे विक्रीस आहेत. युरिया आणि सुपर फॉस्फेट खताला मागणी आहे. परंतु, खताचा तुटवडा जाणवत असल्याचे काही कृषी केंद्र चालकांनी सांगितले.

917 शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे पुरवठा
तालुक्‍यात 1 ते 18 जूनपर्यंत 917 शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. आत्माअंतर्गत 85 गट कार्यरत आहेत. 57.85 मेट्रिक टन खते तर 490.11 क्विंटल बियाणे, सात कापूस बियाणे पॉकिट शेतकऱ्यांकडे पोहोचविण्यात आले. आत्मा गटातर्फे मागणी आल्यास कृषी केंद्राकडून खते, बियाणे पुरविली जातात.

कमी कालावधीत लागवडीचे आवाहन
खरीप हंगामात हलके म्हणजेच कमी कालावधीत होणाऱ्या धानाची लागवड करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. त्यामुळे शेतजमिनीत ओलावा टिकून राहिल्याने रब्बी हंगामातही चांगले उत्पादन घेता येईल.
- आदित्य घोगरे, तालुका कृषी अधिकारी, पवनी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com