पाऊस रुसला! भंडारा जिल्ह्यातील शेतकरी संकटात

farmer
farmer

भंडारा : यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर वरुणराजा रुसला आहे. त्यामुळे आतापर्यंत 20 ते 25 टक्के पाऊस कमी पडला. याचा परिणाम शेतातील धान रोवणीवर झाला आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ 32 टक्के रोवणी झाली आहे.

यानंतरही जोरदार पाऊस झाला नाही तर, शेतातील बरेच मोठे क्षेत्र पडीक राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील खरीप पिकाखालील क्षेत्र दोन लाख हेक्‍टर आहे. यापैकी धानाचे क्षेत्र सर्वाधिक एक लाख 65 हजार हेक्‍टरपर्यंत असते. शेतकरी सिंचनाच्या सोयीनुसार हलके किंवा भारी वाणाची लागवड करतात. चालू वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे नर्सरीची कामे वेळेवर आटोपली आहेत. मात्र, त्यानंतर नियमित पावसात खंड पडला. यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांची रोवणीची कामे खोळंबली आहेत.

आतापर्यंत साकोली तालुक्‍यात 75 टक्के आणि पवनी तालुक्‍यात 50 टक्के रोवणीचे काम पूर्ण झाली आहेत. मात्र, इतर पाच तालुक्‍यांत 18 ते 25 टक्के क्षेत्रातच रोवणीचे काम झालेले आहे. जिल्ह्यात सरासरी 32 टक्के रोवणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे अद्यापही 68 टक्के क्षेत्रात रोवणी खोळंबली आहे.

प्रकल्पांचे सिंचन अपूर्ण
जिल्ह्यात गोसेखुर्द, बावनथडी, चुलबंद या प्रकल्पांसह सहा ते सात उपसा सिंचन प्रकल्प आहेत. त्यामुळे अडचणीच्या वेळी या प्रकल्पांतून सिंचनासाठी पाणी मिळावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. परंतु, देखरेख होत नसल्याने प्रकल्पांचे कालवे आणि वितरिकांची स्थिती बिकट आहे. जुन्या मामा तलावांच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. तुमसर तालुक्‍यात गेल्या दोन दिवसांत दोन कालव्यांना भगदाड पडले. त्यामुळे कालव्यांचे पाणी शेतात साचल्याने पुन्हा नवीन समस्या निर्माण झाली आहे. लाखनी व लाखांदूर तालुक्‍यातील काही गावांत कालव्यांचे पाणी शेतापर्यंत पोहोचत नसल्याची अडचण आहे. ज्या ठिकाणी सिंचनाच्या सोयी असल्याने रोवणीचे काम पूर्ण झाले. तेथे कडक उन्हामुळे शेतातील पिके वाळत असल्याने शेतकऱ्यांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

सविस्तर वाचा - चिमुकल्याने हाती घेतली पोलिस बंदोबस्ताची सूत्रे आणि...

 पाण्यासाठी पूजापाठ
कोरोना संकटामुळे जमावबंदी व जिल्हाबंदी असल्याने शेतकऱ्यांना बॅंकेतील कर्ज, बियाणे-खतांच्या खरेदीसाठी अडचण जाणवली होती. आता रोवणीचे काम वेळेवर आटोपले तर, हातात खरीप पीक घेऊ शकेल. परंतु, याच वेळेवर पाऊस रुसला आहे. त्यामुळे गावागावातील शेतकरी देवासमोर हात जोडून जोरदार पावसासाठी पूजापाठ करीत आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com