फळबाजार पडला ओस

file photo
file photo

अमरावती : सततच्या पावसाने धान्यपीक व भाजीपाल्यासोबतच फळांचेही मोठे नुकसान केले आहे. हंगामातील अनार, सीताफळ व सफरचंदाची आवक मंदावली असतानाच द्राक्षांची स्थानिक बाजारातील आवक बंद झाली आहे. गेल्या पंधरवड्यापासून स्थानिक बाजारातून द्राक्षे गायब झाली आहे. इतर फळे स्थानिक परिसरातील आहेत.
पावसाळा संपला व दिवाळीनंतर फळांचा हंगाम सुरू होतो. विशेषतः अनार, सीताफळ व द्राक्षांनी फळबाजार चांगलाच फुललेला असतो. सोबतच मोसंबी व संत्रा फळांचीही चांगली रेलचेल राहते. ग्राहकांसाठी हा हंगाम मेजवाणीचा असतो. यंदा मात्र मेजवाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.
सततच्या पावसामुळे या भागातील संत्रा, सीताफळ या फळांना जोरदार फटका बसला असतानाच नाशिकमधील द्राक्ष, मराठवाड्यातील मोसंबी, खानदेशातील केळीसह पश्‍चिम महाराष्ट्रातील अनार बागा उद्‌ध्वस्त झाल्या आहेत.
स्थानिक बाजारपेठेत अनार, द्राक्ष व केळी परजिल्ह्यातून विशेषतः नाशिक, जळगाव, धुळे, नगर व पश्‍चिम महाराष्ट्रातून येतात. त्यांची आवक अतिशय कमी झाली आहे. द्राक्षांची तर आवकच बंद आहे. या भागातील संत्रा, सीताफळाला पावसाचा जबर फटका बसला आहे. उत्पादनाची सरासरी घसरल्याने आवक मंदावली आहे. दिवाळीनंतर फुलणारा फळ बाजार यंदा ओस पडला आहे. येथील बाजार समितीमधील फळबाजारातील फळ विक्रेत्यांचे ओटे यंदा भरले नाहीत. त्यामुळे कमी आवक असल्याने फळांचे भाव कडाडले आहेत. किरकोळ बाजारातील फळविक्रीच्या गाड्यांची संख्या कमी झाली आहे.

मालच नाही विकणार काय
यंदा फळांची आवक नाही. घाऊक बाजारात फार कमी प्रमाणांत फळांची आवक आहे. त्यामुळे भाव वधारले असून किरकोळ विक्रतेही कमी झाले आहेत. द्राक्षांचा हा हंगाम असला तरी आवकच नाही. तर, सीताफळ डागदार असल्याने ग्राहकांच्या पसंतीस येत नाहीत. मालच नसल्याने विकावे तरी काय, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया अ.रहमत यांनी व्यक्त केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com